लोकसत्ता टीम

नागपूर : शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वर्धा मार्गावर ‘नो राईट टर्न’ उपक्रम सुरू केला. परंतु, मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर केलेला हा प्रयोग अंगलट येत असल्याचे चित्र आहे. फक्त प्रयोगच करायचा असेल तर पोलीस उपायुक्तांनी वाहनचालकांना वेठीस धरू नये, अशा नकारात्मक प्रतिक्रिया वाहनचालकांकडून व्यक्त होत आहेत.

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत. महाल, इतवारी, लकडगंज, मेडिकल चौक, जरीपटका, पाचपावली, खामला अशा अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असताना उपायुक्तांनी केवळ प्रयोग करायचा म्हणून कार्यालयाजवळ असलेल्या मॉरिस चौक ते कृपलानी चौकाची निवड केली. मात्र, या प्रयोगामुळे नागपूरकर त्रस्त झाले आहेत. अनेक वाहनचालकांना उजव्या बाजूला वळण घेऊन फक्त अर्धा किलोमीटर जायचे असते. मात्र, आता त्यासाठी तीन ते चार किमीचा फेरा मारावा लागत आहे.

आणखी वाचा-नेत्यांनो, मत मागायला येऊ नका! नागपुरातील पांगूळ वसाहतीत फलक

नागरिक काय म्हणतात? …ही तर हुकूमशाही!

वर्दळीच्या वर्धा रोडवर प्रयोग करण्यापूर्वी वाहतूक पोलीस उपायुक्तांनी रस्ता, गर्दी आणि उजवे वळण याचा नीट अभ्यास करायला हवा होता. केलेला प्रयोग जनतेसाठी सोयीचा आहे की अडचणीचा, याचाही विचार करायला हवा होता. लगेच आदेश देऊन थेट रस्त्यावरील वळणे बंद करणे, ही हुकुमशाही झाली. शहरात पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यावर उपायुक्तांना काही तोडगा काढता येईल का? तीन वर्षानंतर उपायुक्त शहरातून जातील, मात्र, हे प्रश्न असेच कायम राहतील. असे प्रयोग जनतेच्या व तज्ज्ञांच्या सूचनेनंतरच केले पाहिजे. -प्रभू राजगडकर.

आधीचा प्रयोग अयशस्वी

यापूर्वीसुद्धा आठवडाभरासाठी मॉरेस टी पॉईंट ते कृपलानी चौक यादरम्यान ‘नो राईट टर्न’ उपक्रम राबवण्यात आला. तो अयशस्वी ठरला. या उपक्रमाची वेळ सायंकाळी ५.३० पासून ८.३० पर्यंत ठेवण्यात आली. ही वेळ खूप घाईची असते. रस्त्यावर वाहनांची वर्दळ खूप असते. त्यामुळे वाहनचालकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. पोलीस उपायुक्तांनी असे प्रयोग करू नये. -सूरज दहिकर.

आणखी वाचा-दिवाळीत सोने ८५ हजारांचा टप्पा ओलांडणार! आजचे दर बघून ग्राहकांमध्ये…

महाल-इतवारीचा विचार का नाही?

सिव्हिल लाईनमध्ये अनेक शासकीय कार्यालये आहेत. सर्वाधिक अधिकारी-कर्मचारी मॉरिस कॉलेज चौक ते कृपलानी चौक हा रस्ता वापरतात. नव्या उपक्रमाचा फटका काचीपुरा चौक, पंचशील चौक व धंतोलीकडून येणाऱ्या वाहनचालकांना बसत असून तेथे वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे रहाटे कॉलनी, कृपलानी चौकातील वाहतूक कोंडी फुटण्याऐवजी कोंडीत भर पडली आहे. वाहतूक पोलिसांनी खामला, महाल-इतवारीसारख्या परिसरात असे प्रयोग करुन दाखवावे. -डॉ. अमर मोंढे.