लोकसत्ता टीम

नागपूर : २०२४ च्या लोकसभा निवडणुका पूर्ण झाल्या. चारसोपारपासून लांब राहिलेल्या व बहुमतही न गाठू शकलेल्या भारतीय जनता पक्षाला एनडीएच्या माध्यमातून सरकार स्थापनेसाठी दावा करावा लागला. मोदींच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा केंद्रात एनडीएचे सरकार येणार आहे. तत्पूर्वी एनडीएची बैठक दिल्लीत पार पडली. त्यात एनडीएच्या नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड झाली. मोदींच्या नावाचा प्रस्ताव संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी ठेवला होता. त्याला अनुमोदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले होते. यावेळी झालेल्या छोटेखानी भाषणात गडकरी यांनी मोदींनी दहा वर्षात केलेल्या कामांचा गौरव करीत पुढील पाच वर्षात होणाऱ्या कामांबाबत मोदींना शुभेच्छा दिल्या होत्या.

रविवारी सायंकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांचे एनडीएच्या बैठकीतील भाषण चांगलेच व्हायरल होत आहे. गडकरी या भाषणात म्हणाले “ दहा वर्षात मला मोदी यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली. या काळात त्यांनी देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा काम केले. देशच नव्हे तर संपूर्ण जगाला त्यांनी आपल्या कामाच्या आधारावर प्रभावित केले. पुढील पाच वर्षात ते आपल्या कामामुळे भारताला जागतिक शक्ती म्हणून पुढे नेईल, असा मला विश्वास वाटतो.”

आणखी वाचा-गडकरींच्या रुपात सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात नागपूरला स्थान

गडकरी केंद्रात मंत्री होणार

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर नागपूरकर गडकरी राष्ट्रीय राजकारणा सक्रिय झाले. २०१४ मध्ये त्यांनी प्रथम नागपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकली व त्यात त्यांनी कॅांग्रसेचे दिग्गज नेते विलास मुत्तेम वार यांचा तब्बल २ लाख ८६ हजार मतांनी पराभव केला होता. पहिल्यांदाच लोकसभा गाठणाऱ्या गडकरी यांना मोदी यांनी मंत्रिमंडळातही स्थान दिले. रस्ते विकास खात्याचे मंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर विविध प्रकारचे सात खाती त्यांच्याकडे पहिल्या पाच वर्षात होती. यात उल्लेखनीय कामगिरी त्यांनी रस्तेविकास खात्यात केली. २०१९ च्या निवडणुकीत तेपुन्हा नागपूरमधून विजयी झालेत. या निवडणुकीत त्यांचे मताधिक्य सत्तरहजाराहून अधिक मतांनी कमी झाले. मात्र मोदी-२ च्या मंत्रिमंडळातही गडकरी यांना संधी मिळाली. पाच वर्षात त्यांनी पुन्हा रस्ते विकास व दळणवळण मंत्रालयात अनेक कामे केली. २०२४ ची निवडणूक गडकरींना तुलनेने कठीण गेली. पाच लाखांहून अधिक मतांनी आपण विजयी होऊ असा विश्वास गडकरी यांना होता. प्रत्यक्षात ते १ लाख ३७ हजार मतांनीच विजयी होऊ शकले. त्यामुळे त्यांनी विजयाचा जल्लोषही साजरा केला नाही.

आणखी वाचा- बुलढाणा : अठरा जणांची अनामत रक्कम जप्त! तिघांचीच टळली नामुष्की

नागपूरमधून सलग तीन वेळा विजयी होऊन हॅट्रिक साधणारे गडकरी केंद्रात मंत्रीपद पटकावण्याची हॅट्रिक साधणार का याबाबत उत्सूकता होती. गडकरी दोन दिवसांपासून दिल्लीतच मुक्कामी आहे. एनडीएचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाल्यावर मंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली होती. महाराष्ट्रातील संभाव्य मंत्र्यांच्या यादीत गडकरी यांचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. रविवारी शपथविधीचा मुहूर्त ठरला. सांयकाळी राष्ट्रपती भवनात हा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी कोणाला शपथ घ्यायची आहे याची यादी तयार करून त्यांना पंतप्रधान कार्यालाच्या माध्यमातून दूरध्वनी केले जाणार होते. त्यानुसार गडकरी यांना मंत्रीपदाची शपथ घेण्याबाबत पीएमओमधून दूरध्वनी आल्याचे माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे गडकरी तिसऱ्यांदा मंत्री होणार हे निश्चित झाले आहे