नागपूर : कंत्राटदाराने जर चांगल्या दर्जाचे काम केले नाही, तर त्यांच्यासह अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंत्राटदार व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला.

महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पाचे लोकार्पण व भूमिपूजन बुधवारी नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. शहरातील विविध भागात मलवाहिनीची मोठी समस्या आहे. अनेक ठिकाणी मलवाहिन्या छोट्या झाल्या आहे. त्यावर मोठ्या इमारती उभ्या झाल्या आहे. त्यामुळे घाण पाणी बाहेर येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे. या कामासाठी वेगवेगळ्या निविदा काढण्यापेक्षा एकच निविदा काढण्यात यावी आणि ज्या कंत्राटदाराकडे काम दिले जाईल त्याने जर चांगले काम केले नाही तर त्यांच्यासह संबंधित अधिकाऱ्याला रगडल्याशिवाय मी राहणार नाही, असे गडकरी म्हणाले. आता चहा, नास्ता, पाणी हे बंद करा आणि चांगले काम करा. चांगल्या दर्जाच्या कामानंतर जे काही करायचे ते तुम्ही करा, मात्र मला चांगल्या गुणवत्तेची कामे हवी आहे, असा सज्जड दम गडकरी यांनी दिला.

हे ही वाचा…“भाजपच्या प्रचारासाठी आम्ही महायुतीत आलो काय ?” अजित पवार गटाच्या नेत्याने सुनावले

पोहरा,नागनदीची स्वच्छता

शहर सुंदर व स्वच्छ व्हावे, चोवीस तास शहरात पाणी पुरवठा झाला पाहिजे. मलवाहिनीची उत्तम व्यवस्था व्हावी यासाठी कामे सुरू करण्यात आली आहे. जवळपास पाच हजार कोटीची कामे आता केली आहे. पोरानदीच्या स्वच्छतेसाठी १ हजार कोटीच्या कामाचे भूमीपूजन झाले. नागनदीच्या प्रकल्पासाठी २४०० कोटी मंजूर झाले आहे. नागपुरातील नद्या स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने काम सुरू करण्यात आले आहे.असे गडकरी म्हणाले.

हे ही वाचा…राजकीय धक्का: आमदार रवी राणा भाजपचे समन्‍वयक? पक्षाचे पदाधिकारी अस्‍वस्‍थ

नागपुरात पाणी समस्या नाही

नागपुरात पाण्याची समस्या राहिलेली नाही. ९० जलकुंभ नव्याने तयार केले जात असून शहराला चोवीस तास पाणी पुरवठा होणार आहे. शहरातील कचऱ्याची समस्या मार्गी लावण्यात आली आहे. लंडन स्ट्रीटचे काम सुरू असून येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात शहर बदलेले दिसणार आहे. रस्त्यावर जे भाजी विक्रेते बसतात आणि त्यांना आता मॉलमध्ये जागा देणार असल्याचे गडकरी म्हणाले. कचऱ्यापासून आता मोठ्या प्रमाणात सीएनजी निर्मिती केली जात आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचा उपयोग न करता सीएनजीवर चालणारी वाहने चालवा असे आवाहन गडकरी यांनी केले.