नागपूर : नैराश्येतून आत्महत्येचा विचार करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे टेलिमानस हेल्प लाईन क्रमांकावर आलेल्या दूरध्वनींच्या विश्लेषणावरून समोर आले आहे. या हेल्पलाईनवर कोल्हापूर आणि पुण्यातून सर्वाधिक दूरध्वनी आले. यात नागपूरचा क्रमांक नववा आहे.

निराश लोकांना आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्टोबर २०२२ मध्ये प्रत्येक राज्यात टेलिमानस टोल फ्री हेल्पलाईन सुरू केली. या हेल्पलाईनवर दूरध्वनी करणाऱ्यांचे समुपदेशन केले जाते. गेल्या दोन वर्षांत या हेल्पलाईनवर संपूर्ण देशभरातून जवळपास १० लाखांपेक्षा जास्त दूरध्वनी आले. महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, नागपूर आणि आंबेजोगाई (बीड) या शहरांत ही सेवा उपलब्ध आहे. प्रत्येक केंद्रात २० समुपदेशक कार्यरत असून ते २४ बाय ७ सेवा देतात. प्रेमसंबंध, परीक्षेची भीती, बेरोजगारी, नोकरीची चिंता, अशा अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रासलेल्यांना मानसिक आधार आणि समुपदेशनाची गरज असते. त्यामुळे ते या टेलिमानस हेल्पलाईनवर दूरध्वनी करतात.

आणखी वाचा-डॉ. सुनील देशमुखांचे काँग्रेस उमेदवारीचे वर्तुळ पूर्ण! पंधरा वर्षांनंतर मिळाली संधी

या क्रमात राज्यातून सर्वाधिक ६ हजार २१० दूरध्वनी कोल्हापुरातून आले. पुण्यातून ५ हजार १०६, सांगली (६५३०), छत्रपती संभाजीनगर (२७९०), बीड (२४६६) नाशिक (१९४२), धाराशिव (१८९२), नागपूर (१८१२) तर जळगावातून १५०५ जणांनी समुपदेशनाच्या अपेक्षेने दूरध्वनी केले.

नैराश्य कशामुळे?

  • उदासीनता (४१ टक्के)
  • लैंगिक संबंधाबाबत समस्या (२९ टक्के)
  • नोकरी, परीक्षा, अभ्यासाविषयक समस्या (२७ टक्के)
  • प्रेमसंबंध, विवाहबाह्य संबंध (३१ टक्के)
  • मानसिक आरोग्याशी संबंधित (१४ टक्के)
  • तरुणी-महिलांविषयी समस्या (११ टक्के)

आणखी वाचा-काँग्रेसकडून बहीण बेदखल, भावाला आमदारकीची डबल हॅटट्रिक करण्याची संधी…

कुटुंबातील संवाद संपला

कुटुंबातील संवाद संपला आहे. आई-वडील पैसे कमवण्यात तर मुले भ्रणध्वनीवर व्यस्त असतात. लोकांशी फक्त व्यावहारिक संबंध ठेवले जातात. त्यामुळे नैराश्य, आत्महत्येचा विचार येतात. कुणीतरी भावनिक आधार द्यावा, ही मनात सुप्त इच्छा असते. अशा लोकांना समुपदेशनाची गरज असते. -प्रा. राजा आकाश, मानसोपचार तज्ज्ञ.