वर्धा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध उपक्रमाचे आयोजन केल्या जाते. खाजगी, स्वयंसेवी संस्था तसेच शासनाचे विविध विभाग यात अग्रेसर असतात. शासनाच्या सामाजिक न्याय विभाग देखील कार्यक्रम व उपक्रम घेत असतो. तसेच समता पंधरवाडा साजरा करतो. आता या विभागाने समता पंधरवाड्या अंतर्गत २०२३- २४ मध्ये बारावी विज्ञान आणि पदवी अभ्यासक्रम प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र अर्थात कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देण्यासाठी विशेष मोहीम आयोजित केली आहे. यात सोयीचे म्हणजे हे प्रमाणपत्र तत्परतेने व कमी कागदपत्रशिवाय मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विविध अभ्यासक्रमासाठी म्हणजे नीट, जेईई, एमबीए, पीएचडी व तत्सम अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र आवश्यक असते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संवैधनिक आरक्षणातून लाभ मिळत असतो. आता यावेळी हे प्रमाणपत्र घेण्यासाठी बार्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार. अर्ज सादर करतांना अर्जदाराने त्याचे जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, महाविद्यालयाचे शिफारस पत्र, शपथ पत्र असे पुरावे हे साक्षांकित प्रती जोडून जात पडताळणीचा पूर्ण अर्ज वेळेत सादर करणे अपेक्षित आहे.
हेही वाचा…“काँग्रेस पहिल्या, भाजप दुसऱ्या क्रमांकाचा शत्रू” ॲड. वामनराव चटप यांची टीका; म्हणाले…
अर्ज वेळेत सादर न केल्यास वंचित राहण्याची शक्यता आहे. जात वैधता प्रमाणपत्र साठी यापूर्वी अर्ज सादर केलेल्या व त्रुटी अभावी अर्ज प्रलंबित असलेल्या अर्जदारांना समितीने संदेश पाठविले आहे. संबंधित अर्जदारांनी देण्यात आलेल्या सूचनेनुसार आवश्यक कागदपत्रसह त्रुटी पूर्तता करण्यासाठी स्वतः जिल्हा पडताळणी कार्यालयात हजर राहण्याची सूचना आहे. महाविद्यालये, विद्यार्थी तसेच पालकांनी जात पडताळणी प्रस्ताव कार्यालयाकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.