वर्धा: सणांचा राजा म्हटल्या जाणाऱ्या श्रावणात विविध सणांचे आगमन होते.तसेच या निमित्ताने खाद्य पदार्थांची रेलचेल व फुलांची नयनरम्य उधळण दिसून येते.कवी कुसुमाग्रज म्हणून गेले की ‘ हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजरा श्रावण ‘ हे खरेच.या मासात प्रथम येतो तो श्रावणी सोमवार. नवविवाहिता या सोमवारचे व्रत पहिले पाच वर्ष तर काही आयुष्यभर करतात.त्यानंतर मंगळागौरची महिलांची धुमधाम सुरू होते.
संसार सुखाचा व्हावा म्हणून असलेले हे खास व्रत होय. नवविवाहितेस सासर व माहेरचे सौख्य मिळावे, असा हेतू.मंगळागौरीची पूजा उखाणे,फुगडी, ओटी भरणे,रात्री जागरण व पारंपरिक खेळांनी घर गजबजून निघते.विविध रंगी फुलांची सजावट , रांगोळ्या, गमतीजमती यामुळे प्रसन्न वातावरण असते.माहेरी आलेली कन्या आनंद देत घेत नटूनथटून भेटीगाठी घेत असते.मोठेपणा गळून पडतो.माहेरवाशिणी महादेवाची पूजा घालतात. फेर धरून गाणी म्हणतात.मनातल्या भावना व्यक्त होतात.गौर जागवितात.यानंतर नाग देवतेची पूजा करणारा नागपंचमी सण येतो.नागाला इजा होवू नये म्हणून जमीन खणली जात नाही.शेतकऱ्यांचा मित्र म्हणून त्याची पूजा केली जाते.पुढे नारळी पौर्णिमा व रक्षा बंधन जोडूनच येतात.
हेही वाचा >>>नागपूर: चारित्र्यावर संशय; पतीने केला पत्नीचा खून
हेही वाचा >>>नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात आठ फुटांचा साप.. वारंवार साप का निघतात..
भावा बहिणीच्या नात्याला उजाळा देणारा रक्षा बंधन हा सण मिठाईची तसेच भेटवस्तूंची चंगळ साधणारा असतो.नारळी पौर्णिमेला कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करीत नव्या हंगामाची मासेमारी सुरू करतात.दणक्यात साजरा केल्या जाणाऱ्या बालगोपालांच्या आनंदास उधाण येणाऱ्या कृष्ण जन्माष्टमीची तर बातच न्यारी.आता तर व्यावसायिक स्वरूप आलेल्या या सणाचा गोपाळकाला फार चर्चेत असतो.श्रावणाची सांगता करणारा सण म्हणून पिठोरी अमावस्या येते.या दिवशी ग्रामीण भागात नवचैतन्य येते कारण पोळा साजरा केल्या जातो.आबालवृद्ध त्यात सहभागी असतात. बैलजोडीस विश्रांती दिल्या जाते.त्याला सजवून मिरवणूक काढल्या जाते.खास पुरणपोळीचा नैवेद्य दिल्या जातो.असा हा श्रावण मास सणांचा व आनंदाचा म्हणून लक्षात राहतो.याच काळात सृष्टी कोवळ्या पल्लविने उजळून निघते.पाना फुलांना बहर आला असतो.पारिजातक, सोनचाफा,बकुळी,सोनटक्का,सायली,गौरी व रानफुले यांची रेलचेल असते.दगडावरील शेवाळ पण आपले सौंदर्य राखून असते. एक प्रकारे निसर्गाचे पूजन व त्याच्या प्रती कृतज्ञता अर्पण करणारा हा काळ समजल्या जातो.