लोकसत्ता टीम
बुलढाणा: राजकीय पक्ष कागदोपत्री मागण्या व एकमेकावर टीका करीत असताना वन बुलढाणा मिशनचे संदीपदादा शेळके आपले सहकारी वैद्यकीय चमू व साधन सामुग्रीसह पूरग्रस्त जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात दाखल झाले. त्यांनी उपाययोजना करीत मदत करायला काल,२२ जुलैच्या रात्रीपासूनच सुरुवात केली.
जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके वन बुलडाणा मिशनच्या तरुणांची फौज घेऊन पुरग्रस्त भागात पोहचले. रात्रीपासूनच वन बुलडाणा मिशनने मदतकार्याला सुरुवात केली. युवकांनी अनेक घरांतील पाणी उपसून गाळ काढला. पूरग्रस्तांच्या जेवणाची व्यवस्था तसेच आवश्यक ती मदत केल्या जात आहे. तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात आली.
आणखी वाचा-गोंदियात धावत्या कारने अचानक घेतला पेट, मग झाले काय वाचा…
अभूतपूर्व संकट
दोन्ही तालुक्यातील परिस्थिती मन हेलावून टाकणारी आहे. पुराचे पाणी नागरिकांच्या घरात घुसल्याने कपडे, अन्नधान्य, गॅस सिलिंडर वाहून गेले आहे. स्वयंपाकाचे कुठलेच साधन अनेक घरात आता शिल्लक नाही. शेती खरडून गेली आहे. यामुळे मदत कार्यासाठी इतर संघटनांनी सुद्धा पुढाकार घेण्याचे आवाहन शेळके यांनी केले.घरातील पुस्तके,कपडे वाहून गेल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने राजर्षी शाहू परिवार व मिशनने पाऊले उचलली आहेत. अशा नैसर्गिक संकटामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने वैद्यकीय शिबिर लावण्यात आले आहे.याठिकाणी तज्ञ डॉक्टरांची टीम सेवेसाठी उपलब्ध राहील.
आणखी वाचा-न्यायमूर्ती गवईंना गडचिरोलीतील रानटी हत्तींनी घातली भुरळ, म्हणाले…
सर्वे नको, मदतच द्या
अतिवृष्टीने जे नुकसान झालेय ते मन हेलावून टाकणारे, काळीज पिळवटून टाकणारे आहेत. उघड्या डोळ्यांने हे नुकसान दिसत आहे, त्यामुळे सर्वे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तात्काळ मदत कशी पोहचवता येईल याचा विचार प्रशासकीय यंत्रणेने करावा. शासकीय पंचनामे होऊन मदत कशी मिळते याचा वाईट अनुभव लोकांना आहे, ती मदत यायला उशीर होईल, तोपर्यंत नागरिकांना वाऱ्यावर सोडता का? असा सवाल संदीप शेळके यांनी प्रशासकीय यंत्रणेला केला. पोलिस अधिक्षकांशी फोनवरून संवाद साधत त्यांनी नागरिकांच्या तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था केलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्याची मागणी केली.