नागपूर : विकासाची निवडणूक हरतो आहे म्हणून भाजपने निवडणूक धर्मावर नेली. हा निवडणुकीनंतरचा एक्झिट पोल आहे, ज्यावेळी प्रत्यक्षात निकाल येईल तेव्हा मोदी सरकार बदललेले दिसेल, असे मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. 

विजय वडेट्टीवार नागपुरात बोलत होते. १० पैकी ८ लोक मोदींच्या विरोधात बोलताना दिसतात. १० वर्षे जनतेने सरकारचा त्रास सहन केला. देशात काही ठिकाणी आम्हाला कमी दाखवतात तर काही जास्त दाखवतात, ३५ च्या आसपास आम्ही महाराष्ट्रात असू, कर्नाटकातही आम्ही पुढे राहू,सत्तेत मोदी येत आहेत, याचा भाजपच्या नेत्यांना दोन दिवस आनंद घेऊ द्या. ४ जूनला सगळे स्पष्ट होईल. एक्झिट पोल नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या बाजूनेच जास्त जागा दाखवतात. अनेकदा पोल चुकलेही आहे. त्यामुळे निवडणुकीच्या संदर्भात ४ जून ला खरे चित्र स्पष्ट होईल.

हेही वाचा…धक्कादायक! अंगणात झोपलेल्या व्यक्तीला अज्ञातांनी पेट्रोल टाकून पेटवले; गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त छल्लेवाडा गावातील घटना

ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण आहे, शेती एकाची पेरणी दुसऱ्याने केली. कितीही पक्ष फोडले,चिन्ह पळवले तरी पक्ष फोडणाऱ्याला ही चपराक राहणार आहे. अजित दादा यांना कुठेही प्रतिसाद नव्हता, यावरून स्पष्ट आहे की पक्ष फोडणाऱ्याला लोक गाडल्याशिवाय राहत नाही असेही वडेट्टीवार म्हणाले.

चंद्रपूर मध्ये आम्ही जिंकत आहोत याचा आनंद आहे.२०१९ मध्ये एकमेव जागा आली होती,तो काँग्रेसचा गड आम्ही राखत आहोत असेही वडेट्टीवार म्हणाले.गडचिरोली जागा १ लाख मतांच्या अंतराने जिंकत आहो,उमेदवारांचा जनसंपर्क आणि सरकारविरोधी राग ,त्यामुळे गडचिरोली आमच्या ताब्यात आहे .

हेही वाचा…दुर्दैवी! नागपुरात सात दिवसांत २६ बेघरांचा मृत्यू; उष्माघाताचे बळी की…

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट हे मुंगेरीलालचे स्वप्न पाहत आहेत. विधानसभा आम्ही एकतर्फी जिंकत आहोत,हे लुटारुंचे सरकार फेकायचे असे जनतेने ठरवले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.