नागपूर : सरकारने हिवाळी अधिवेशनात विदर्भासह महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, तरुण, उद्योजकांच्या तोंडाला पाने पुसली, असा आरोप अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, अधिवेशनाच्या एक दिवसापूर्वी मंत्रिमंडळ स्थापन होऊनही बिन खात्याच्या मंत्र्यांचे अधिवेशन झाले. मागील काळातील योजना व खोटे दिवा स्वप्न दाखवण्याचे काम या सरकारने केले. शेतकरी, कामगार,युवक व बेरोजगारांना कोणतेही न्याय व मदत सरकारने जाहीर केली नसल्याचा आरोपही दानवे यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एसटी बस खरेदीतील गैरव्यवहार, बोगस औषधे, राज्यातील बिघडलेली कायद्या सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी विषयांवर विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीच्या आमदारांनी दोन्ही सभागृहात सरकारला सळो की पळो करून सोडले. महाविकास आघाडीची हीच भूमिका यापुढे असेल. तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.

हेही वाचा…वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प ७ वर्षात पूर्ण करणार, मुख्यमंत्री

संतोष देशमुख हत्या प्रकरण

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपी वाल्मिकी कराड फरार आहे. वाल्मिकी कराड नागपुरात असल्याचे मी सांगितले. परंतु पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी मला एक शब्दही विचारला नाही. परभणी येथील तरुण सोमनाथ सूर्यवंशी मृत्यमप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई झाली नाही. मराठी कुटुंबावर हल्ला कल्याण येथे परप्रांतीय माणसाने मराठी कुटुंबावर हल्ला केला, आदी घटना हे सरकार आल्यावर घडल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला. त्यावर माफी मागण्याऐवजी विरोधकांनी काय काय केले हे भाजपचे नेते सांगत राहिले. कांदा निर्यात धोरण बदलण्यासाठी केंद्राकडे जाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना मदतीची घोषणा, विमा, प्रोत्साहन नाही, असा आरोपही दानवे यांनी केला. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर, सुनील प्रभू उपस्थित होते.

हेही वाचा…छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांसह शिवशस्त्र प्रत्यक्ष पाहण्याची संधी

गडचिरोलीतील खनिज लाडका उद्योगपती लुटतोय- पटोले

मविआ सरकारने पहिल्या अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. पण युती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देऊनही घोषणा केली नाही. गडचिरोलीत विपुल खनिज संपत्ती आहे. ती लाडका उद्योगपती लुटत आहे. धारावी प्रकल्प अदानीलाच देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बीडची घटना माणुसकीला काळीमा बीड व परभणीतील घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या असून सरकारने गुंड पोसल्याचा हा परिणाम आहे. परभणी प्रकरणात फक्त एका पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. निष्णात वकिलाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी बीड प्रकरणात एका मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री आपली खूर्ची वाचवण्यासाठी मित्रपक्षांच्या मंत्र्यांना घाबरतात, असा आरोपही पटोले यांनी केला.

राहुल गांधी परभणीला भेट देणार

राहुल गांधी हे सोमवारी परभणीला भेट देणार आहेत. पोलीस लाठीमारात मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला ते भेट देणार आहेत. त्यांना बीड दौऱ्याबाबतही कार्यक्रम दिला आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, असे पटोले यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition leaders in nagpur accused government of neglecting farmers laborers and youth of vidarbha in winter session mnb 82 sud 02