नागपूर: उपराजधानीत जवळपास दोन हजार दोनशेपेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक व्यवसायाच्या निमित्ताने राहतात. त्यात सर्वधर्मीयांचा समावेश आहे. भारत सरकारकडून त्यांनी रितसर ‘व्हिसा’ घेतलेला आहे. त्यामुळे त्यांचे वास्तव्य कायदेशीर ठरते.

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर केंद्र सरकारने भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडावा, असे निर्देश दिले आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. तसेच याबाबत गुप्तचर विभाग सतर्क झाला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपुरात जवळपास २ हजार २०० पेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिक व्यवसायानिमित्त किंवा अन्य कारणास्तव नागपुरात राहतात. उत्तर नागपूर आणि जवळपासच्या परिसरात ‘व्हिसा’वर आलेल्या या नागरिकांची संख्या मोठी आहे.

सुरक्षाविषयक केंद्रीय समितीच्या (सीसीएस) बैठकीनंतर नागपुरात सुरक्षा दलाकडून शोध मोहीम राबवण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात पोलीस प्रशासनाला अधिकृत निर्देश अद्यापही प्राप्त झाले नाहीत. खबरदारी म्हणून पोलीस प्रशासन ही मोहीम राबवत आहे.

नागपुरात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची पोलीस विभागाकडे अधिकृत माहिती असली तरी ‘व्हिसा’ संपल्यानंतरही ते नागपुरात वास्तव्यास आहेत काय? कोणता व्यवसाय करतात? अशी माहिती नव्याने घेतली जात आहे.

पाकिस्तानी नागरिक ‘व्हिसा’ची मुदत संपल्यावर त्याचे नूतनीकरण करतात. व्यवसाय करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांत सर्वधर्मीयांचा समावेश आहे. मात्र, त्यांचा व्हिसा रद्द केला जाईल. त्यांना ४८ तासांत देश सोडण्याचा निर्वाणिचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागपुरात ‘व्हिसा’वर वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांत भीती आणि चिंता पसरली आहे.

पोलीस प्रशासनाकडून शोध मोहीम

सरकारच्या आदेशानुसार कारवाई करणार आहोत. खबरदारी म्हणून पोलीस प्रशासन सतर्क असून शोध मोहीम राबवली जात आहे. – डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त