नागपूर: उपराजधानीमधील मल्टी-मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब आणि विमानतळ परिसरात असलेले पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्क येत्या ९ मार्चपासून उत्पादनासाठी सज्ज होणार आहे. या मेगा फूड पार्कची पायाभरणी सप्टेंबर २०१६ मध्ये झाली होती. आता हे पार्क फळे आणि भाजीपाला प्रक्रियेचे एक प्रमुख केंद्र बनणार आहे. हे फूड पार्क विशेषतः संत्री, गोड लिंबू, लिंबू इत्यादी लिंबूवर्गीय फळांच्या प्रक्रियेसाठी डिझाइन करण्यात आले आहे. यामध्ये, दररोज ८०० टन फळांवर प्रक्रिया करून रस, रस सांद्रता, लगदा, पेस्ट आणि प्युरी तयार केली जाणार आहे. यासोबतच आंबा, पेरू, पपई, डाळिंब, स्ट्रॉबेरी, सफरचंद, नाशपाती, टोमॅटो आणि गाजर यांसारख्या उष्णकटिबंधीय फळांवरही प्रक्रिया केली जाईल. आतापर्यंत यामध्ये १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या फूड आणि हर्बल पार्क बद्दल अधिक माहिती देताना पतंजलीचे आचार्य बाळकृष्ण म्हणाले की, स्थानिक महाराष्ट्रातील लोकांना रोजगार देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आम्ही या ठिकाणी स्थानिक तरुणांना फूड प्रोसेसिंग बद्दल कौशल्य देण्यासाठी ट्रेनिंग ही चालवण्याचा विचार असल्याचे आम्ही या ठिकाणी जेवढा संत्रा शेतकऱ्यांकडून आणला जाईल तो सर्व घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्या फूड पार्कमध्ये रोज ८०० टन संत्रा लागणारच आहे. शिवाय त्यापेक्षा जास्त संत्रा प्रतिदिन आला तरी त्याचा वापर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. नागपुरातील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
स्थानिकांनाच रोजगार देणार – आचार्य बाळकृष्ण
पुढे आचार्य बाळकृष्ण म्हणाले की, आम्ही ‘बी’ आणि ‘सी’ दर्जाच्या छोट्या आकाराची संत्रा घेणार आहोत. त्यामुळे लोकांना ‘ए’ ग्रेडची संत्री बाजारातून खायला मिळतील. संत्र्याचा फक्त रस काढण्यासाठी वापर होणार नाही, तर संत्र्याची साल आणि लगद्याचा वापर ही इतर उत्पाद बनवण्यासाठी करणार आहोत. दरम्यान फूड आणि हर्बल पार्कमुळे दहा हजार लोकांना प्रत्यक्ष स्वरूपात रोजगार मिळेल, असे प्रयत्न राहणार आहे. स्थानिक महाराष्ट्रातील लोकांना रोजगार देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आम्ही या ठिकाणी स्थानिक तरुणांना फूड प्रोसेसिंग बद्दल कौशल्य देण्यासाठी ट्रेनिंग ही चालवण्याचा विचार असल्याचे ही आचार्य बाळकृष्ण म्हणाले.
१ हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक
जे तंत्रज्ञान आम्ही इथे वापरणार आहोत, ते तंत्रज्ञान आशिया खंडात पहिल्यांदा फूड प्रोसेसिंग उद्योगात वापरले जात आहे. त्यामुळे आमचे उत्पादन जगात कुठल्या ही देशात निर्यात होऊ शकेल, असे दर्जाचे राहणार आहे. आतापर्यंत आम्ही १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. ती भविष्यात वाढत जाणार आहे. या प्रकल्पात आमच्याकडे सेझच्या बाहेर २२५ एकर जमीन आहे, तर सेजमध्ये १०० एकर जमीन आहे. सध्या ५०० पेक्षा जास्त कर्मचारी या ठिकाणी काम करत आहे. संत्र्याशिवाय या ठिकाणी आवळा, एलोवेरा, पेरू आणि इतर फळांचे ज्यूस तयार करण्याची तयारी आहे. फक्त शेतकऱ्यांनी आमच्यापर्यंत फळ घेऊन येण्याची गरज आहे.