नागपूर : मिहानमधील बहुतप्रतीक्षित पतंजली फूड व हर्बल पार्क सुरू होण्यास अखेर मुहूर्त सापडला असून येत्या ९ मार्चला या प्रकल्पातून उत्पादनास सुरुवात होत आहे. संत्रा, मोसंबी, कोरफड, कडूलिंब, लिंबू, आवळा आणि इतर औषधी वनस्पतीसह इतर कच्चामाल पतंजली प्रकल्प येथील शेतकऱ्यांकडून विकत घेणार आहे. या प्रकल्पातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे विदर्भातील ५० हजारपेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळणे अपेक्षित आहे. कच्च्या व तयार झालेल्या मालाची वाहतूक, पॅकेजिंग प्रक्रिया यातून मोठी रोजगार निर्मिती होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० सप्टेंबर २०१६ मध्ये पतंजलीच्या फूड प्रोसेसिंग प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. मिहानमध्ये या समूहाला २६५ एकर जमीन अल्पदरात देण्यात आली आहे. या प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळेल आणि युवकांना रोजगार मिळेल, अशी अपेक्षा आहे. प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन आठ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. परंतु उत्पादनास सुरुवात झाली नाही. त्यामुळे शेतकरी आणि युवकांची घोर निराशा झाली आहे. अखेर या प्रकल्पातून उत्पादनास पुढील महिन्यात सुरुवात होईल, असे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पात कंपनी सुमारे १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. दररोज ८०० ते ९०० टन संत्र्याची आवक होणार आहे.
पतंजली फूड व हर्बल पार्क मिहान येथे सुरू होणे हा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णक्षण आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या संत्रा, मोसंबी व कृषी आधारित उत्पादनांना चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन होईल कारण विदर्भातील शेतकऱ्यांचा माल या प्रकल्पासाठी घेण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विदर्भात विशेषतः शेतकऱ्यांच्या घरात सुख-समृद्धी नांदेल. मुख्य म्हणजे शेतकरी आत्महत्यांवर आळा बसेल. या प्रकल्पातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे विदर्भातील ५० हजारपेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळणे अपेक्षित आहे. कच्च्या व तयार झालेल्या मालाची वाहतूक, पॅकेजिंग प्रक्रिया यातून मोठी रोजगार निर्मिती होणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे सावनेर-कळमेश्वर क्षेत्राचे आमदार आशीष देशमुख यांनी व्यक्त केली.