वर्धा : लग्नाचे आमिष देत महिलेची शारीरिक व आर्थिक फसवणूक करण्याचे हजारो प्रकार उजेडात येतात. मात्र तरीही भोळ्या महिलांची अशी फसवणूक टळता टळत नसल्याचे दिसून येते. या प्रकरणात तसेच आर्वी येथील एका खाजगी बँकेत एक सुविद्य महिला कार्यरत आहे. त्याच बँकेत आरोपी अक्षय सुभाष माळोदे हा कार्यरत आहे.
नांदेड जिल्ह्यातील हातगावच्या या ३३ वर्षीय अक्षयने पीडित महिला कर्मचाऱ्याशी सलगी वाढविली. दाट ओळख झाली. याच ओळखीतून अक्षयने सदर महिलेकडे पैसे मागणे सूरू केले. ही उधार रक्कम २ लाख ५८ हजार ९०० रुपयावर गेली. या पैश्यासाठी तगादा लावणे सूरू केल्यावर अक्षयने सदर महिलेस अमरावती येथील एका लॉजवर पैसे घेण्यास बोलावले. अक्षयने आपले खरे रूप दाखविले. त्याने या महिलेवर बळजबरी केली. धाक दाखवीत शारीरिक अत्याचार केले. तेव्हा पुरती फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आले.
आर्वी येथील एल आय सी कॉलनीत राहणाऱ्या या महिला कर्मचाऱ्याने मग आर्वी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. आणि पोलीस यंत्रणा कामास लागली. तेव्हा नांदेड जिल्ह्यातील हातगाव येथील पत्ता देणाऱ्या या आरोपीच्या शोधात पोलीस चमुने संपूर्ण नांदेड जिल्हा पालथा घातला. पण तो सापडला नाहीच. तेव्हा तांत्रिक मदत घेण्यात आली. त्यात आरोपी अक्षय हा वाशीम जिल्ह्यात असल्याचे दिसून आले. पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी विशेष पथक त्या ठिकाणी पाठविले. आरोपी अक्षय जाळ्यात अडकला. त्यास अटक करण्यात आली आहे.
आता चौकशीत त्याने फसवणूकीचे आणखी काही प्रकार केले काय, याबाबत तपास सूरू आहे. अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी देवराव खंडेराव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सतीश डेहनकर उपपोलीस निरीक्षक सर्वेश बेलसरे, दिगंबर रुईकर, प्रवीण सदावर्ते, नीलेश करडे, स्वप्नील निकुरे तसेच सायबर पोलीस वर्धाचे अक्षय राऊत व अनुप कावळे यांनी ही कामगिरी फत्ते केली.
या प्रकरणात महिलेची फसवणूक सोबत असणाऱ्या पुरुष सहकाऱ्याने केली आहे. सलगी करायची, ओळख वाढवायची, दाट मैत्री झाली की पैशांचे व्यवहार सूरू करायचे आणि मग अडकलेले पैसे देण्यासाठी थापा मारण्याचा प्रकार झाला. त्यातून हतबल महिलेवर शारीरिक अत्याचार, अशी मोडस ऑपरेन्डी दिसून आली आहे.