नागपूर : रस्त्यावर चिखल, पुराच्या पाण्यासोबत आलेला गाळ, घरात पाणी शिरल्याने ओल्या झालेल्या वस्तू सुकवण्यासाठी रस्त्यावर ठेवलेल्या, नादुरुस्त वाहने, असे चित्र पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या अंबाझरी लेआऊटचे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाल्यानंतर तेथून निघालेला पाण्याचा मोठा लोंढा हा सर्वप्रथम अंबाझरी लेआऊटमध्येच शिरला व लोकांच्या घरात पाणी शिरले. यामुळे अनेकांचे ‘टीव्ही’, ‘फ्रीज’, ‘लॅपटॉप’ खराब झाले. रस्त्यालगत असलेले कॅफे, हॉटेल्समध्ये पाणी शिरल्याने तेथील फर्निचर खराब झाले. पुराच्या पाण्यात बुडाल्याने अनेक वाहने नादुरुस्त झाली. पुराच्या दुसऱ्या दिवशी सकाळी रस्त्यावर साचलेला गाळ, कचरा स्वच्छ करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले होते. काही ठिकाणी तर कचऱ्याचे ढिगच्या ढिग साचले होते. ते साफ करण्यासाठी ‘जेसीबी’ लावण्यात आला. साचलेला गाळ महापालिकेने गोळा करून एका ठिकाणी जमा केल्यावर त्याचे उंचवटे तयार झाले आहे.

हेही वाचा- पोलीस दादा, गणवेशात नको ना नाचू; पोलीस महासंचालकांचे काय आहेत आदेश? वाचा…

अनेकांनी त्यांच्या घरातील ओले झालेले पलंग, आलमाऱ्या, सोफासेट, कपडे, गाद्या वाळवण्यासाठी रस्त्यावर ठेवल्या होत्या. इमारतींवर लोकांनी गाद्या उन्हात वाळायला ठेवल्या होत्या. काही इमारतींमध्ये अजूनही तळघरात पाणी साचलेले आहे. ते काढण्याचे काम दिवसभर सुरू होते. याच परिसरात फॅशन डिझाईन प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेतही पाणी शिरल्याने तेथील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांनीही रविवारी सोफे, खुर्च्या रस्त्यावर सुकण्यासाठी ठेवल्या होत्या. परिसरातील हाॅटेलमध्येही पाणी शिरून आतमधील सर्व बैठक रचना खराब झाली. त्यांना यातून सावरण्याची चिंता लागली आहे. रस्त्यावरील चहा टपऱ्यांचेही सर्व सामान पुरात वाहून गेले.

खाटेपर्यंत पाणी आले

अंबाझरी लेआऊटमधील आत्मदीप संस्थेच्या जिज्ञासा कुबडे-चवलढाल म्हणाल्या, शुक्रवारी रात्री तीननंतर झोपेत असताना पलंगापर्यंत पाणी आल्यावर जाग आली. बाहेर बघितले तर सर्वत्र पाणीच पाणी होते व त्यात झपाट्याने वाढ होत होती. त्यामुळे आतमधूनच वरच्या मजल्यावर गेल्याने पुरातून सुटका झाली. पण, घरातील सर्व साहित्य टीव्ही, फ्रीज, लॅपटॉप पाण्यात बुडून खराब झाले.

हेही वाचा – कोणतीही परिक्षा नाही, थेट निवड! महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध पदांची भरती, आजच अर्ज करा..

त्रिमूर्तीनगरातील दुकानांना फटका

त्रिमूर्तीनगरातील गजानन महाराज मंदिर मार्गावरील १० ते १५ दुकानांत पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. विद्याधर टोणपे यांचे कापडाचे दुकान होते. त्यातील साड्या, ड्रेस मटेरियल पूर्ण पाण्याने खराब झाले. सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचे टोणपे यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Picture of flooded settlements in nagpur stuff on the road tv laptop damaged due to water cwb 76 ssb
Show comments