काँग्रेसला केवळ जनतेची लूट कशी करायची हेच माहित आहे. काँग्रेस गरिबांना आणखी गरीब बनवण्याचा प्रयत्न करते आहे. गरीब भारत काँग्रेसच्या राजकारणासाठी फायदेशीर आहे. तसेच अर्बन नक्षलवादाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्नही काँग्रेसकडून केली जातो आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच देशातील तरुणांना अंमलीपदार्थ विकून त्या पैशांतून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जातो आहे, असा आरोपाही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी वाशिममध्ये बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीचे दर्शन घेतलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी?

“स्वातंत्र्याच्या लढ्यात बंजारा समाजाने मोठं योगदान दिले आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतर या समाजाची नेहमीच उपेक्षा झाली आहे. या समाजाचा सन्मान करणं ही तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांची जबाबादारी होती. मात्र, काँग्रेसच्या सरकारने बंजारा समाजाला मुख्य प्रवाहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसची बंजारा समाजाबाबतची भूमिकाही त्यांचा अपमान करणारी राहिली आहे”, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

हेही वाचा – पंतप्रधानांच्या हस्ते प्रकल्पांचे लोकार्पण; मुंबईकरांच्या सेवेत पहिली भुयारी मेट्रो, मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

“काँग्रेसला केवळ लुटणं माहिती आहे”

“काँग्रेसला केवळ जनतेची लूट कशी करायची हेच माहित आहे. काँग्रेस गरिबांना आणखी गरीब बनवण्याचा प्रयत्न करते आहे. गरीब भारत काँग्रेसच्या राजकारणासाठी फायदेशीर आहे. दुसरीकडे अर्बन नक्षलवादाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्नही काँग्रेसकडून केला जातो आहे. ज्या लोकांना भारताचा निकास होऊ नये असं वाटतं तेच लोक आज काँग्रेसचे जवळचे मित्र आहेत. त्यामुळे जनतेने काँग्रेसापासून सावध राहायला हवं”, असं आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केलं.

“अंमलीपदार्थ विकून काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे”

पुढे बोलताना ते म्हणाले, “दिल्लीत काही दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ पकडले गेले. या अंमलीपदार्थांचे रॅकेट चालवणारा मुख्य सुत्रधार हा काँग्रेसचा नेता असल्याच पुढं आलं आहे. काँग्रेस देशातील तरुणांना अंमलीपदार्थ विकून त्या पैशांतून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करते आहे. आपल्याला या धोक्यापासून सावध राहायचं हवं”, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा – पंतप्रधानांच्या सभेपूर्वी घोडबंदर विद्रुप, मोदी हेलेकाॅप्टरने येणार तरीही अतिउत्साही पदाधिकाऱ्यांची घोडबंदरभर फलकबाजी

“महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची लूट केली”

दरम्यान, “केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. महाराष्ट्र सरकारमुळे राज्यातील शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होतो आहे. शिंदे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे वीजबील माफ केलं आहे. मात्र, शिंदे सरकार येण्यापूर्वी अडीच वर्ष राज्यातील शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना कराव लागला. काँग्रेस आणि त्यांच्या महाविकास आघाडीतील सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट करण्याची एकही संधी सोडली नाही. शेतकऱ्यांसंदर्भातील योजना बंद करणं आणि या योजनांच्या पैशात भ्रष्टाचार करणं हे मुख्य कार्यक्रम महाविकास आघाडीच्या सरकारने राबवले”, अशी टीकाही पंतप्रधान मोदी यांनी केली.