अमरावती : अर्धांगवायूने पीडित असलेल्या जन्मदात्या आईवर मुलाने अतिप्रसंग केला. नात्याला काळीमा फासणारी ही संतापजनक घटना दर्यापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडितेच्या पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

पीडित ५५ वर्षीय महिलेला अर्धांगवायू झाला आहे. ही महिला स्‍पष्‍टपणे बोलू शकत नाही. १८ सप्टेंबर रोजी आरोपी मुलगा हा त्यांच्यासोबत अनैसर्गिक पद्धतीने अत्याचार करण्याच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी पीडित महिलेचे पती हे घराचे दार लोटून आत गेले. त्यावेळी तो निंदनीय प्रकार त्यांच्या दृष्टीस पडला. त्यांनी आरोपी मुलाला ढकलून देत त्याला पीडितेपासून दूर केले. त्यानंतर आरोपी मुलगा हा तेथून पळून गेला. पीडित महिलेच्या पतीने त्यांना पाहिले असता त्यांना त्यांच्या गालावर मारल्याचे वळ दिसून आले. त्यावेळी पीडित महिलेने हातवारे करून आरोपी मुलाने यापूर्वी आपल्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून मारहाण केल्याचे पतीला सांगितले. यापूर्वीसुद्धा पीडितेने हातवारे करून सदर घटनेबाबत त्यांना अवगत केले होते. परंतु, आरोपी हा मुलगा असल्याने समाजात बदनामी होईल, या भीतीपोटी त्यांनी त्याबाबत तक्रार दिली नव्हती. मात्र, १८ सप्टेंबर रोजी सदर घटना स्वत: डोळ्यांनी पाहिल्याने पीडितेच्या पतीने दर्यापूर ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

हेही वाचा >>> धक्कादायक ! चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमाचा प्राणघातक हल्ला

महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र राज्य देशात चवस्था स्थानावर आहे. बलात्कार करणाऱ्या आरोपींमध्ये सर्वाधिक कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, पती, मित्र, प्रियकरांसह ओळखीच्याच व्यक्तींचा समावेश आहे.

हेही वाचा >>> नागपूर: तरुणीने अनेकांच्या नावावर घेतले कोट्यवधीचे कर्ज

राज्य सरकार आणि महिला आयोग नेहमी महिलांवरील लैँगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेते. महिलांवर बलात्कार करणाऱ्या आरोपींमध्ये सर्वाधिक कुटुंबातील सदस्य, जवळचे नातेवाईक, ओळखीचे व्यक्ती, पती किंवा प्रियकरांचा समावेश असतो. अनेक तरूणी, महिला बलात्कार किंवा विनयभंगासारख्या घटना समाजात बदनामी होऊ म्हणून सहन करतात.

बदनामीच्या भीतीपोटी तक्रारीस नकार

विवाहित महिलांवर बलात्कार केल्याच्या घटनांमध्ये सर्वाधिक आरोपी हे सासरच्या कुटुंबातील आहेत. कुटुंबातील व्यक्ती, पती, नातेवाईक यांच्याकडून महिलांचे लैंगिक शोषणाच्या घटना उघडकीस जरी आल्या तरीही पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येत नाहीत. कुटुंबाची बदनामी होईल, अशी भीती दाखवून अनेक विवाहित महिलांची समजूत घातल्या जाते. मात्र, बलात्काराच्या घटनानंतर अनेक महिला तक्रारीऐवजी थेट आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेत असल्याची नोंद आहे.