अकोला: लोकसंख्या वाढीचा भस्मासूर लक्षात घेता कुटुंब नियोजन ही काळाजी गरज झाली आहे. पुरुष व महिलांच्या समानतेच्या चर्चा होत असतांना कुटुंब नियोजनात मात्र पुरुष महिलांच्या तुलनेत माघारलेलेच आहेत.

नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात पुरुषांची प्रचंड उदासीनता असून त्यांची नकारघंटा कायम असल्याचे दिसून येते. कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलांवरच असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. वाशिम जिल्ह्यात सव्वा वर्षांत केवळ दोन पुरुषांनीच नसबंदी शस्त्रक्रिया केली, तर चार हजार ८२९ महिलांनी शस्त्रक्रिया केली.  

२७ जून ते १० जुलै या कालावधीत दाम्पत्य संपर्क पंधरवाडा साजरा करताना समाजात जनजागृती व संवेदीकरण करण्यात आले. जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात ११ ते २४ जुलै दरम्यान प्रत्यक्ष कुटुंब नियोजानाच्या सेवा पुरविण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याची माहिती वाशिमचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.ठोंबरे यांनी दिली. या कालावधीत कुटुंब कल्याण शिबिरासाठी आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल कावरखे म्हणाले.

हेही वाचा >>>मुंबई उच्च न्यायालयात मागासवर्गीय आरक्षण अंमलबजावणी नाही! राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची नोटीस…

डॉ.विजय काळे यांनी कुटुंब नियोजनाची आकडेवारी सविस्तरपणे मांडली. मागील आर्थिक वर्षात एकूण दोन पुरुष शस्त्रक्रिया झाल्या आहेत. एक हजार १०७ बिनटाका, तर तीन हजार ५२९ टाक्याच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तसेच दोन हजार ८९१ तांबी, दोन हजार ०९१ ‘पीपीआययूसीडी’ बसविण्यात आल्या आहेत. ३९ हजार ९३७ गर्भनिरोधक गोळ्यांचे, तर दोन लाख २६ हजार ९९३ निरोधचे वाटप करण्यात आले आहे. यावर्षी एप्रिल महिन्यापासून एकूण १९३ टाक्याच्या शस्त्रक्रिया झाल्या असून ७४८ तांबी, ३२७ ‘पीपीआययूसीडी’ बसविण्यात आल्या आहेत. नऊ हजार ८४२ गर्भनिरोधक गोळ्यांचे तर ४६ हजार २६३ निरोधाचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती वाशिम आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

सामान्य जनतेने जास्तीत जास्त पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करून घेण्याचे व त्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी वैभव वाघमारे यांनी केले आहे.

हेही वाचा >>>माहिती अधिकारात प्रसूतीची आकडेवारी चुकवली! नागपूर महापालिका म्हणते…

कोणतीही बाधा नाही

पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ही अत्यंत साधी-सोपी-सुलभ, असून त्याचे अनेक लाभ आहेत. यामुळे लैंगिक सुखात कोणतीही बाधा उत्पन्न होता नाही. प्रत्येक विवाहित पुरुषाने अपत्य नको असल्यास महिलांना होणारी गर्भधारणा टाळण्यासाठी हा पर्याय स्विकारण्यास हरकत नाही, असे जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी स्वप्निल चव्हाण म्हणाले.

कुटुंबनियोजन म्हणजे काय?

कुटुंबनियोजन म्हणजे कुटुंब केव्हा वाढवायचे या बद्दलचे संतती नियमनाद्वारे नियोजन होय. यात मुलांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांच्या जन्माच्या दरम्यान अंतराळ, विशेषतः गर्भनिरोधक किंवा स्वयंसेवी नसबंदीद्वारे नियंत्रित करणे यांचा समावेश होतो.

राष्‍ट्रीय कुटूंब कल्‍याण कार्यक्रम कार्यपद्धती

राष्‍ट्रीय कुटूंब कल्‍याण कार्यक्रमांतर्गत राज्‍यात नागरी आरोग्‍य केंद्रे, नागरी कुटूंब कल्‍याण केंद्रे, सहायक परिचारीका प्रसाविका प्रशिक्षण केंद्रे या योजना सुरु करण्‍यात आलेल्‍या आहेत. या संस्‍था महानगरपालिका व नगरपालिका कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. हा कार्यक्रम राबविण्‍यासाठी स्‍थानिक व स्‍वयंसेवी संस्‍थांचा सहभाग घेण्‍यात येतो. स्‍थानिक व स्‍वयंसेवी संस्‍था राष्‍ट्रीय कुटूंब कल्‍याण कार्यक्रमामध्‍ये स्‍वेच्‍छेने सहभागी झालेल्‍या आहेत. केंद्र शासनाच्‍या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध योजनेअंतर्गत या संस्‍थांना आर्थिक सहाय्य, सहाय्यक अनुदानाच्‍या स्‍वरुपात दिले जाते. या कार्यक्रमामध्‍ये प्रत्‍येक नागरी आरोग्‍य केंद्र व नागरी कुटूंब कल्‍याण केंद्र यांना लोकसंख्‍येचे कार्यक्षेत्र ठरवून दिले जाते मात्र नागरी आरोग्‍य सुविधा योजनाअंतर्गत मंजूर केलेल्‍या केंद्रास त्‍यांच्‍या लोकसंख्‍येपैकी ४० टक्‍के लोकसंख्‍या झोपडपट़टी अथवा तत्‍सम भागातील असणे आवश्‍यक असते. या कार्यक्षेत्रातील लोकांना कुटूंब कल्‍याण कार्यक्रम सेवा तेथील अधिकारी व कर्मचारी यांचेमार्फत दिली जाते. या केंद्रामार्फत मुखावाटे घ्‍यावयाच्‍या गर्भनिरोधक गोळया व निरोध यांचे वाटप करण्‍यांत येते. तांबी बसविण्‍याची सुविधाही या केंद्रातर्फे पुरविण्‍यांत येते. कांही संस्‍थांद्वारे कुटूंब नियोजन शस्‍त्रक्रिया ही सेवा दिली जाते

कुटुंब नियोजन साधनांचा उपयोग

-गरोदरपण लांबवण्यास उपयोग होतो.

-संतती नियमाच्या साधनांचा उपयोग दोन मुलांमध्ये योग्य अंतर ठेवण्यासाठी होतो.

-अनेक वेळा गरोदर राहिल्यानंतर पुढील गर्भधारणा टाळण्याकरिता होतो.

-प्रसुतिपश्चात मातेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.