नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या पाठीशी निश्चितच कोणीतरी प्रभावशाली व्यक्ती असून त्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. कोरटकरला राज्य सरकारने ११ मार्चपर्यंत अटक न केल्यास शिवभक्तांच्या धैर्याचा बांध फुटल्याशिवाय राहणार नाही, असा शब्दात राजे मुधोजी भोसले यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला.
राजे मुधोजी भोसले यांनी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली व कोरटकरच्या विधानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा केली. ते म्हणाले, ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून काही समाजकंटकांकडून वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. चित्रपट उत्कृष्ट आहे. हिंदी चित्रपट असल्याने संपूर्ण देशाला छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य कळले. परंतु, काही असामाजिक तत्वांना त्याबद्दल असूया वाटत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वाईट बोलून आणि त्यांना कमी लेखून या लोकांनी आपल्या मनातील द्वेष ओकला आहे. एक विशिष्ट समाज कायम छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा विरोध करीत आहे. ३०० ते ३५० वर्षांपासून हे असेच सुरू आहे. इतिहासाकडे इतिहास म्हणूनच बघितले तर असे प्रश्न निर्माण होणार नाहीत. ज्यांना महापुरुषांबद्दल चांगले बोलणे शक्य होत नाही त्यांनी किमान त्यांच्याबद्दल वाईटही बोलू नये. कोरटकरने जे बोलला त्यातून त्याला एका विशिष्ट समाजात ‘हिरो’ बनायचे होते. पण, त्या समाजालाही अशा प्रकारचे बोलणे मान्य असेलच असे नाही. एक मात्र खरे की, सामाजात तेढ निर्माण करण्याचा हेतू यातून स्पष्टपणे दिसून येतो. काही लोक अशाप्रकारचे मुद्दे उपस्थित करून मराठा समाजाच्या आरक्षणाला बगल देण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, अशी शंकाही भोसले यांनी उपस्थित केली.
‘तो’ चिल्लर तर अटक का नाही?
कोरटकर हा चिल्लर असेल तर त्याला ताबडतोब अटक का करण्यात आली नाही, त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यास विलंब का झाला? त्याच्या पाठीशी कोणीतरी शक्तिशाली व्यक्ती आहे. त्याशिवाय अटकेपासून तो वाचूच शकत नाही. तो इंदूरला पळून गेला ही माहिती शिवभक्तांना कळते. तेथे त्याचा भ्रमणध्वनी आढळतो. परंतु पोलिसांना थांगपत्ता लागत नाही. कोरटकरची पत्नी काही दिवसांनी तो भ्रमणध्वनी नागपूर पोलिसांच्या सुपूर्द करते. परंतु, तो भ्रमणध्वनी कोल्हापूर पोलिसांना दिला जात नाही. २५ फेब्रुवारीला गुन्हा घडतो आणि ४ मार्चला भ्रमणध्वनी जप्त केला जातो. हे काय चालले आहे, असा सवालही भोसले यांनी केला.
मुख्यमंत्र्यांचा अपमान
एका एतिहासकाराला नागपुरातून फोन करून धमकी दिली जाते आणि महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले जातात. राज्याचे मुख्यमंत्र्याचे नाव घेऊन ही धमकी दिली जाते. याचा अर्थ काय? असे करणे म्हणजे मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला ताबडतोब अटक करायला हवी होती, असेही भोसले म्हणाले.
शिवभक्त गनिमी काव्यासाठी तयार
शिवशक्तांना राज्यात शांतता हवी आहे. परंतु ते महापुरुषांचा अपमान कदापि सहन करणार नाहीत. कोरटकरने वापरलेली भाषा द्वेषपूर्ण आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये संताप आहे. ते गनिमी काव्यासाठी तयार आहेत. आता अधिक काळ थांबू शकत नाही. लोक काय करतील हे सांगता येत नाही. कोरटरकरला सुरक्षित ठेवायचे असेल तर सरकारने त्याला अटक करून आत ठेवावे, असा सूचक इशाराही भोसले यांनी दिला.
…. अन्यथा शिवभक्तांच्या धैर्याचा बांध फुटल्याशिवाय राहणार नाही
कोरटकरला ११ मार्चपर्यंत अटक न केल्यास शिवभक्तांच्या धैर्याचा बांध फुटल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात राजे मुधोजी भोसले यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला.