100 Years of Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत नियमित म्हटली जाणारी प्रार्थना वर्धा जिल्ह्यात जन्मास आली. ‘ नमस्ते सदा वत्सले मातृभूमे ‘ ही ती प्रार्थना होय. ही प्रार्थना सर्वप्रथम २३ एप्रिल १९४० रोजी पुणे येथील संघ शिक्षा वर्गात म्हटली गेली होती. या प्रार्थनेचे प्रारूप सर्वप्रथम १९३९ मध्ये ठरले. वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील आप्पाजी जोशी यांच्या वाड्यात त्यावर चर्चा झाली. या बैठकीत आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, श्री गुरुजी, बाबासाहेब आपटे, बाळासाहेब देवरस आप्पाजी जोशी, नानासाहेब टालातुले असे प्रमुख लोक हजर होते. सुरवातीस प्रार्थना अर्धी मराठी व अर्धी हिंदी भाषेत तयार झाली. परंतू संपूर्ण भारताचा विचार करून ती एकच भाषेत असावी, असा विचार पुढे आला.

म्हणून देशाची सर्वमान्य संस्कृत भाषा अंतिम ठरली. प्रार्थनेचा संस्कृत मध्ये अनुवाद झाला. सर्व प्रार्थना संस्कृत भाषेत व केवळ शेवटी ‘ भारत माता की जय ‘ हे हिंदीतील शब्द घेण्यात आले. हे संस्कृत रूपांतर पुणे येथील नरहरी नारायण भिडे यांनी केले. तेथील संघ वर्गात यादवराव जोशी यांनी लयबद्ध स्वरात सर्वप्रथम गायन केले. तेव्हापासून प्रार्थना नियमित म्हटली जात आहे. महिलांची शाखा असणाऱ्या राष्ट्र सेविका समिती व विदेशात भरणाऱ्या हिंदू स्वयंसेवक संघाची प्रार्थना वेगळी आहे.

हे ही वाचा…ओटीटी प्लॅटफॉर्मवर सरसंघचालकांचे परखड मत, “समाज बिघडत चालला, कायद्याच्या चौकटीत…”

संघ शाखा किंवा अन्य कार्यक्रमात या प्रार्थना सादर करने अनिवार्य आहे. संघ ध्वजापुढे प्रार्थना म्हणून वंदन केले जाते. वर्धा जिल्ह्यातील सिंदी येथे या प्रार्थनेचा जन्म झाला म्हणून यास संघाच्या प्रार्थनेचे पाळणाघर असा उल्लेख होत असतो