नागपूर : अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून राज्य सरकारने दिवाळीपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करून मदत खात्यात जमा न केल्यास ऐन दिवाळीत आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था यंदा अत्यंत बिकट झाली असून अतिवृष्टीने शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी तर नैसर्गिक संकटामुळे हतबल झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा रुपयाही अजूनपर्यंत मिळालेला नाही, पंचनामे करण्यातही प्रशासन ढिम्म असून आता परतीच्या पावसानेही शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्य सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारा पटोले यांनी दिला आहे.

हेही वाचा : नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची आज निवडणूक ; बहुमतानंतरही नाराजीमुळे काँग्रेसमध्ये धाकधूक

अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता राज्य सरकारने तातडीने हालचाली करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे होते. पण, तसे झाले नाही. महाविकास आघाडी सरकारने नैसर्गिक आपत्ती ओढवताच तत्काळ दहा हजारांची रोख मदत दिली व नंतर १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. आघाडी सरकार येताच पहिला निर्णय शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले. अटी, शर्थी, नियमांचे अडथळे निर्माण करुन शेतकऱ्याला ऑनलाईनच्या रांगेत दिवसरात्र उभे केले नाही. शेतकरी हा सरकारचा प्राधान्यक्रम असला पाहिजे पण भाजपा सरकार हे शेतकरीविरोधी असल्याने मदतीसाठी हात आखडताच घेतला जातो, असा आरोपही त्यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest against government in diwali if drought not declared congress nana patole nagpur tmb 01