नागपूर : देशात संविधान कोणी बदलवू शकत नाही आणि आरक्षण कोणी हटवू शकत नाही ,मात्र राहुल गांधी आरक्षण हटवू शकतात. ते विदेशात जाऊन भारताची बदनामी करतात. त्यामुळे त्यांचा पासपोर्ट जप्त केला पाहिजे किंवा त्यांच्याकडून देशाच्या विरोधात वक्तव्य करणार नाही, असे लिहून घेतले पाहिजे, असे केंद्रीय समाज कल्याण खात्याचे रामदास आठवले नागपूर येथे पत्रकार परिषदेत म्हणाले.

मारवाडी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाच्या निमित्त आठवले नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. राहुल गांधी समजदार नेते आहे, मात्र देशाच्या बाहेर जाऊन आरक्षण बंद करण्याची भाषा करणे हे योग्य नाही. राहुल गांधींच्या विरोधात देशभर निषेध आंदोलने झाली. मात्र त्यांची जीभ छाटली पाहिजे किंवा जिभेला चटके दिले पाहिजे, असे वक्तव्य करणे योग्य नाही, आम्ही त्याचे समर्थन करत नाही ,असे, आठवले म्हणाले. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. विरोधी पक्षाने संविधान बदलणार म्हणून खोटा प्रचार केला. त्याचाइ परिणाम म्हणून आमच्या जागा कमी झाल्या. मात्र आता विधानसभा निवडणुकीत असे काही होणार नाही. मोदी यांनी संविधानावर डोक टेकवून शपथ घेतली आहे. लंडनचे घर असो की इंदु मिलच्या जागेवर स्मारकाचे काम असो, त्यात नरेंद्र मोदींचे योगदान आहे.. त्यांच्या काळात हे काम झाले. मोदी कधीही संविधान बदलणार नाही, असेही आठवले म्हणाले.

हे ही वाचा…नागपूर : काँग्रेसचा सर्व ६ जागांवर दावा, चेन्नीथला पटोलेंच्या उपस्थितीत आज बैठक

रिपाइंला १२ जागा सोडाव्या

आगामी विधासभा निवडणुकीत रिपाइंने ( आठवले गट)१० ते १२ जागांची मागणी केली, आहे. चर्चेत कमी जास्त होऊ शकतात. मात्र विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात आम्ही लढणार आहे, असेही आठवले म्हणाले. आमचा पक्ष छोटा असला तरी कार्यकर्त्याच्या माध्यमातून गाव पातळीपर्यंत आमचा पक्ष पोहचला आहे. त्यामुळे महायुतीला आमच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. देवेंद्र फडणवीस समजुतदार आहे, त्यामुळे ते लक्ष देतील असेही आठवले म्हणाले.

हे ही वाचा… नागपुरातील नागनदीची पूजा, श्राद्ध, अन् प्रसाद वाटपाचे नियोजन,पुरग्रस्त म्हणतात…

आंबेडकरसोबत आले तर…

मी आणि प्रकाश आंबेडकर सोबत आलो तर महाराष्ट्राचे राजकारणात बरेच काही बदल होऊ शकतात. मी एकटा असल्याने दलितांना सत्तेत हवा तेवढा वाटा मिळत नाही. आम्ही दोघे एकत्रित आलो, तर ते होऊ शकेल.. मात्र त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी आमच्यासोबत आले पाहिजे. मी काही वंचित बहुजन आघाडीमध्ये जाणार नाही. आंबेडकर यांनी थोडं सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. त्यांनी समजून घेतले पाहिजे. ते एकटे लढून सत्तेत येऊ शकत नाही. त्यांनी आघाडी करणे आवश्यक आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाचे नाव बदलायला नको होते.. त्यांनी रिपब्लिकन पक्ष चालवायला हवा होता असेही आठवले म्हणाले. .