नागपूर : लाखोंच्या संख्येने हक्काचे मतदार असले, तरी कायम कोणत्या तरी पक्षाच्या वळचणीला गेल्याने कधीही एकसंघ राहिला नसलेला पक्ष म्हणजे भारतीय रिपब्लिकन पक्ष (आरपीआय). निवडणूक आयोगाकडे या पक्षाचे वेगवेगळे गट नोंदणीकृत आहेत. सध्या या पक्षाचे एकही आमदार किंवा कुठेही सत्ता नाही. असे असतानाही आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने विधानसभा निवडणुकीमध्ये कंबर कसली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करत थेट ७५ जागांवर उमेदवार लढवण्याची घोषणा केली आहे. यावेळी महाविकास आघाडीवर काय आरोप केले आणि याचा काँग्रेस पक्षाला काय फटका बसू शकतो ते बघूया.

आघाडीने रिपब्लिकन कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले

आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे यांनी पत्रकारांना माहिती दिली की, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर विश्वास ठेवला होता. परंतु रिपब्लिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निवडणूक लढवली जात आहे. महाविकास आघाडीने विश्वासघात केला आहे. तसेच रिपब्लिकन कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा राज्यातील राखीव मतदार संघासह ७५ जागा स्वबळावर लढणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे यांनी दिली.

हे ही वाचा…काँग्रेसच्या या बड्या नेत्यासमोर नवीन उमेदवाराचे आव्हान, उत्तर नागपूर मतदारसंघात…

महाविकास आघाडीने पत्राला उत्तर न दिल्याचा आरोप

लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावून संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यात यशस्वी झाले. ही बाब महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना माहित आहे. सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यालयात आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने पत्र पाठविले होते. नामांकन अर्ज भरण्याची दोन दिवस तयारी असताना दोन दिवस उरले असता पत्राचे कोणतीही उत्तर मिळाली नाही. त्यामुळे पत्राची दखल घेण्यात आली नाही. अशी शोकांतिका पक्षाचे अध्यक्ष बागडे यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा…बेकायदेशीर शुल्क उकळणाऱ्या राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाविरोधात चौकशीचे आदेश

या मतदारसंघाचा समावेश

रिपब्लिकन नेत्यांची भाजपसोबतही जुळवून घेतले आहे. महाविकास आघाडी भिस्त फक्त आंबेडकरी रिपब्लिकन अल्पसंख्यांक कार्यकर्तांच्या हातात आहे. महाविकास आघाडीला धडा शिकविण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा ७५ जागा स्वबळावर लढवणार याची माहिती देण्यात आली. मतदार संघाची यादी खालील प्रमाणे शाहादा, धुळे शहर, भुसावळ, मालेगाव, नांदगाव, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, येवला, देवडळाली, सिंदखेडराजा, बाळापुर अकोला, रिसोड, कारंजा, वाशिम, तिवसा, अमरावती, देवळी, आर्वी, वर्धा, सावनेर, उमरेड, रामटेक, दक्षिण नागपूर, उत्तर नागपूर, पूर्व नागपूर, दक्षिण पश्चिम नागपूर, हिंगणा, काटोल, साकोली, भंडारा, बल्लारपूर, यवतमाळ, आर्णी, राळेगाव, लोहा, कळमनुरी, परभणी आदी मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे.