लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नागपूर : देशातील अनेक भागात अपेक्षेपेक्षा लवकर प्रवेश केलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) जाताना मात्र थोडा उशीर केला आहे. सोमवारपासून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. पश्चिम राजस्थान आणि कच्छच्या काही भागातून त्याच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे.

मान्सूनच्या परतीच्या प्रवासादरम्यान दक्षिण आणि मध्यभारतात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. मान्सूनच्या माघारीची रेषा अनुपगड, बिकानेर, जोधपूर, भुज आणि द्वारकामधून जात आहे.

आणखी वाचा-राज्यावर कर्मचारी संपामुळे वीज संकट… महावितरणकडून आलेले चर्चेचे निमंत्रण…

मान्सूनचे आगमन व परतीचा प्रवास

देशाच्या अनेक भागात यंदा मान्सून वेळेपेक्षा आधीच दाखल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे त्याचा परतीचा प्रवास देखील लवकर सुरू होईल, असे वाटत होते. प्रत्यक्षात नियोजित वेळेच्या सहा दिवस उशीराने त्याचा प्ररतीचा प्रवास सुरु होत आहे. गेल्यावर्षी देखील २५ सप्टेंबरला मान्सून राजस्थानातून माघारी फिरला होता. मान्सूनच्या आगमन आणि परतीच्या वेळापत्रकानुसार १७ सप्टेंबर ही राजस्थानमधून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यावेळी केरळ आणि ईशान्य भारतात ३० मे रोजी मान्सूनचे एकाचवेळी आगमन झाले. जे आगमनाच्या सामान्य तारखेच्या दोन दिवस आधी होते. १९ मे रोजी मान्सून अंदमान निकोबार बेटावर दाखल झाला होता. तर ३० मे रोजी तो केरळमध्ये पोहोचला होता. तर सहा जूनला तो महाराष्ट्रात पोहोचला.

मान्सूनच्या परतीचा प्रवास कुठून?

२३ सप्टेंबरला पश्चिम राजस्थान आणि गुजरातमधील कच्छच्या काही भागातून मान्सून परतीच्या प्रवासाला लागला. आणखी काही भागातून मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. २४ सप्टेंबरला पश्चिम राजस्थान आणि लगतच्या पंजाब, गुजरात, हरियाणाच्या काही भागातून मान्सून माघार घेईल, अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. यापूर्वी २०१९ साली मान्सून नऊ ऑक्टोबरला, २०२० साली २८ सप्टेंबरला, २०२१ साली सहा ऑक्टोबरला, २०२२ साली २० सप्टेंबरला, २०२३ साली २५ सप्टेंबरला तर आता २०२४ साली २३ सप्टेंबरला मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

आणखी वाचा-पंचनामे न करताच शेतकऱ्यांची प्रकरणे अपात्र, महसूल मंत्री म्हणतात…

या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला तरी जाताजाता तो दणका देऊन जाणार आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात रविवारपासूनच मध्यम ते मूसळधार स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सोलापूर, बीड, अहमदनगर, नांदेड, हिंगोली, परभणी, चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.