नागपूर : लोकसभा निवडणुकीत भाजपला सहकार्य करण्यापासून जाणीवपूर्वक लांब राहिलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण सक्रिय झाला आहे. महाराष्ट्राची जबाबदारी संघातील अत्यंत वरिष्ठ नेत्याकडे देण्यात आल्याचा दावा संघाशी निगडित सूत्रांनी केला. या घडामोडींमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्व वाढले आहे. यानिमित्ताने या दोन राज्यांतील भाजपच्या निर्णय प्रक्रियेमध्ये संघाचे वर्चस्व दिसू लागले आहे. निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाकडून सूक्ष्म पातळीवर नियोजन करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे भाजपच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील बाराही मतदारसंघातील नियोजन व तेथील सामाजिक समीकरणांची माहिती संघाकडून जाणून घेण्यात आली.

दिल्लीमध्ये भाजप आणि संघाच्या वरिष्ठांची बैठक

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, सहकार्यवाह अरुण कुमार, भाजपचे संघटना महासचिव बी. एल. संतोष यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात दिल्लीमध्ये बैठक घेतली होती. त्यानंतर संघाकडून मोठ्या हालचालींना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संघाच्या ज्येष्ठ नेत्यांची चर्चा झाली होती.

हेही वाचा…जहाल नक्षल दाम्पत्याचे आत्मसमर्पण; महाराष्ट्रासह ओडिशात हिंसक कारवायांत सहभाग

हिंदुत्वापासून दूर न जाण्याच्या संघाच्या सूचना

राज्यात जातीय समीकरणांचे लोकसभा निवडणुकीत ज्या बूथवर भाजपला मताधिक्य होते, तेथील मतदानाची टक्केवारी ४० ते ४५ टक्के इतकी होती. तर जिथे भाजपला मताधिक्य नव्हते तेथे मतदानाचा टक्के ६० टक्के दिसून येत होता. प्रभाव असलेल्या भागातील लोक हव्या त्या प्रमाणात बाहेर निघाले नाही किंवा भाजपला त्यांना मतदान केंद्रांपर्यंत नेता आले नाही. मताधिक्य असलेल्या बूथवरील मतदान टक्का वाढवा व तो ६० टक्यांवर न्या असे गणितच संघाकडून मांडण्यात आले. गणित जुळविणे तर बरोबर आहे, मात्र हिंदुत्वापासून दूर आऊ नका अशी सूचना यावेळी करण्यात आली.

मूळ कॅडरकडे लक्ष देण्याची सूचना

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांच्या मार्गदर्शनात ही बैठक झाली होती. यात संघाशी जुळलेल्या काही संस्थांचे पदाधिकारी व भाजपचे जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. भाजपमध्ये तिकीट कुणाला द्यावे तो तुमचा प्रश्न आहे. मात्र मूळ कॅडरच्या कार्यकर्त्यांकडेदेखील लक्ष दिले पाहिजे. त्यांनी पक्षाला इथपर्यंत आणले आहे याचा विसर पडू देऊ नका असे लिमये यांनी सांगितले. यावेळी संघाकडून जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांतील सामाजिक समीकरणांचा आढावा घेण्यात आला.

हेही वाचा…मुलाचा खून करुन बाप मृतदेहाजवळच झोपला…

आरक्षणासंदर्भातील संभ्रम दूर करा

अनेक कार्यकर्ते लोकसभेत गाफील राहिले. त्यांना सक्रियपणे कामाला लावा, तसेच सोशल माध्यमांवर केवळ लाइक करून चालणार नाही. त्यावर कार्यकर्त्यांनी व्यक्त व्हायला हवे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विरोधकांकडून आरक्षणावरून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. अशा विषयांना तव्यांवर आधारित उत्तरे देत जनतेतील संचम दूर करण्यावर भर द्यावा, अशी सूचना संघाकडून करण्यात आली.