वीज यंत्रणेतील दोष अथवा बिघाड तसेच नेमक्या कोणत्या फीडरवर वीजपुरवठा खंडित झाला आहे, याबाबत तत्काळ माहिती मिळून लवकरात लवकर बिघाड दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणची ‘सुपरवायजरी कंट्रोल अँण्ड डेटा ॲक्विझिशन सिस्टिम’ अर्थात ‘स्काडा’ प्रणाली अमरावतीत सुरू करण्यात आली असली, तरी तांत्रिक अडचणींमुळे पाच उपकेंद्रांमध्ये ‘स्काडा’ कायान्वित नसल्याची नसल्याची माहिती पुढे आली आहे.
एखाद्या वीज वाहिनीमध्ये, रोहित्रे किंवा अन्य ठिकाणी कधी बिघाड निर्माण होईल, हे सांगता येत नाही. काही वेळेला बिघाड मोठा असल्यास बराच वेळ वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे विजेविना नागरिकांचे चांगलेच हाल होतात. शिवाय उद्योग-व्यवसायांनादेखील फटका बसतो. परंतु, अनेकदा नेमका कोणत्या ठिकाणी बिघाड झाला आहे, याबाबत लवकर समजत नाही. बिघाड शोधण्यामध्येच काही तास वाया जातात. परंतु, स्काडा प्रणालीमुळे नेमका कोणत्या फिडरवर वीजपुरवठा खंडित झाला आहे किंवा वीज यंत्रणेत कोठे बिघाड झाल्यास त्या ठिकाणची माहिती त्वरित संगणकीय प्रणालीवर प्राप्त होते. त्यामुळे बिघाडाचा लवकर शोध लागल्याने तत्काळ बिघाड दुरुस्त होऊन वीजपुरवठा पूर्ववत करणे शक्य होते.
स्काडा प्रणालीमुळे शहरातील कोणत्या ठिकाणी कोणत्या वीजवाहिनीवर कोणती अडचण आहे, कोणत्या परिसरातील किती परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला ही माहिती महावितरणच्या तज्ज्ञांना नियंत्रण कक्षामध्ये माहीत होते. त्यामुळे कंट्रोलरुममध्ये बसलेले तज्ज्ञ तातडीने संबधित परिसरातील महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहिती देऊन नेमका दोष कोणत्या ठिकाणी आहे, याबाबत अचूक माहिती देतात. यामुळे फिल्डवर काम करणाऱ्या संबधित अधिकारी कर्मचाऱ्याला दोष शोधण्यासाठी पायपीट करण्याची गरज राहत नाही, केवळ त्या ठिकाणी जाऊन काम करायचे, दोष कुठे काय आहे, ही माहिती तंतोतत मिळत असल्यामुळे वेळेची बचत होऊन तातडीने वीजपुरवठा सुरू होतो. अमरावतीत स्काडा प्रणालीला सात वर्षे झाली असली तरी सध्या स्काडा अंतर्गत सर्व उपकेंद्र पूर्ण क्षमेतेने कार्यान्वित नसल्याने वीज यंत्रणेतील बिघाड शोधणे अवघड झाले आहे.
हेही वाचा- इंडियन सायन्स कॉंग्रेसमध्ये आज; नोबेल विजेत्यांशी संवाद आणि बरेच काही
अमरावती स्काडा वितरण प्रणाली अंतर्गत १४ उपकेंद्र असून त्यापैकी ९ उपकेंद्र स्काडाद्वारे कार्यान्वित आहेत. उर्वरित ५ उपकेंद्रात देखभालीचे कंत्राट संपल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी हे उपकेंद्र स्काडाद्वारे कार्यान्वित नाहीत. देखभाल-दुरुस्तीचे कंत्राट जून २०२१ पासून संपले असून अद्यापही यासंदर्भात शासनाकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. या कामाच्या कंत्राटाचे नूतनीकरण करण्याबाबत महावितरण कंपनीच्या मुख्यालय पातळीवर कार्यवाही सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.