नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यजमानपद भूषवत असलेल्या १०८व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे मंगळवारी थाटात उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात असलेल्या विविध योजना आणि मोदींच्या दूरदृष्टीमुळेच विज्ञान प्रगतिपथावर असल्याचा सूर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा सर्वच मान्यवरांचा होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन क्षेत्रात कार्य केले. ग्रामविकासाचे कार्य करताना विवेकवादी विचारांचा प्रचार केला. त्यांच्या नावाच्या विद्यापीठात ही काँग्रेस होणे हे महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात विज्ञान तंत्रज्ञानात देशाने प्रगती केली आहे. त्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. देशाने औषधनिर्मिती आणि हवामान शास्त्र यात प्रगती साधली असून त्याबाबत जगात लौकिक मिळवला आहे. देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत झाली आहे.

हेही वाचा >>> पंतप्रधानांपाठोपाठ राष्ट्रपतींनीही नाकारले भारतीय विज्ञान काँग्रेसच्या समारोपाचे निमंत्रण

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देशाने विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. याचे कारण विज्ञानाला चालना व वैज्ञानिकांना मिळत असलेली सन्मानाची वागणूक होय. देशात आज ८० हजारांहून अधिक स्टार्टअप झाले आहेत. समुद्रतळातील शोध घेण्यासाठी पंतप्रधानांनी डीप ओशियन मिशनला चालना दिली. अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रालाही त्यांनी चालना दिली. त्यात खाजगी क्षेत्राला सहभागी होण्याची संधी दिली. सद्यस्थितीतही पर्यावरण, ग्रीन एनर्जी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा विविध क्षेत्रातील संशोधनाला चालना देऊन जगासाठी एक आदर्श समाज आपण घडवत आहोत, असेही ते म्हणाले. तर राज्यपाल आठ वर्षांत मोदींच्या नेतृत्वात देश सर्वच क्षेत्रात प्रगती करत असल्याचे म्हणाले.

हेही वाचा >>> उपराजधानी हत्याकांडाने हादरली, तलवारीने भोसकून भरचौकात युवकाचा खून

विज्ञानामुळे संसाधनांचे संरक्षण व प्रगती – फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महिला सक्षमीकरणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ताकद हीच लिंगसमानता साधू शकते. जलवायू परिवर्तन, पर्यावरणावरील संकट यासारख्या महत्त्वाच्या समस्यांबाबत विज्ञान तंत्रज्ञान हेच उपाय शोधू शकते. विविध संकल्पनांचा विकास या काँग्रेसमध्ये होवो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आर्थिक महासत्ता बनण्याचा आधार विज्ञान – गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, विज्ञानाचे दोन उद्दिष्ट असावेत, आत्मनिर्भर भारत आणि अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण, देशाचे सकल घरेलू उत्पादनात सेवा क्षेत्राचे योगदान ५२ ते ५४ टक्के आहे. उत्पादन क्षेत्राचे योगदान २२ ते २४ टक्के, कृषी क्षेत्राचे योगदान १२ ते १४ टक्के. देशाची ६५ टक्के लोकसंख्या ही खेड्यात राहते. त्या लोकांच्या शाश्वत विकासासाठी विज्ञानाने कार्य करावे. देशात अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर्सची बनवण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकारण्याचा आधार विज्ञानाची प्रगती असू शकेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Science progressing because of modi along with the governor chief minister deputy chief minister and ministers dag 87 ysh