वर्धा : तुमची गरज राहली नाही, अशी भाषा करणाऱ्या भाजपला आता संघाची आठवण झाली आहे. अर्थात लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झटका बसला, हे त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे. संघाची मदत आवश्यक अशी उपरती झालेल्या भाजपला मग मातृसंस्था म्हटल्या जाणाऱ्या संघानेही माफ केल्याची ही ताजी घडामोड म्हणावी लागेल.

दोन दिवसांपूर्वी संघाची पश्चिम विदर्भ शाखा व भाजप नेते यांची गोपनीय बैठक संपन्न झाली. संघ संघटनेत वर्धा हा अमरावती जिल्ह्याशी जोडला असून त्याच रचनेत अचलपूर हा वेगळा जिल्हा मानल्या जातो. या बैठकीत संघाचे पश्चिम विदर्भ प्रमुख श्रीधर घाटे तसेच सहकारी उपस्थित होते. यात वर्धा जिल्ह्यातून दोन आमदार, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, जिल्हा भाजपचे तीन वरिष्ठ पदाधिकारी सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीत संघाशी समन्वय न राखल्याने नामुष्की झाल्याचे भाजपने खुल्या दिलाने मान्य केले.

हेही वाचा – अजित पवारांची अमरावतीतील जनसन्‍मान यात्रा रद्द

मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत असे होता कामा नये. म्हणून सहकार्य करण्याची विनंती भाजपकडून झाली. तेव्हा संघ पदाधिकाऱ्यांनी कशी मदत हवी अशी विचारणा केली. त्यावर निवडणूक प्रचारात आमच्या त्रुटी, कमतरता, उणिवा आम्हास लक्षात येत नाहीत. त्या समजल्या तर दूर करून प्रचार यंत्रणा सक्षम करता येईल. त्या त्रुटी शोधून निदर्शनास आणण्याची मदत संघ पदाधिकाऱ्यांनी करावी, अशी गळ संघास घालण्यात आली. कारण संघाशी समन्वय न ठेवल्याने त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आल्याचे भाजपने प्रांजळपणे मान्य केल्याचे बैठकीत उपस्थित एका नेत्याने नमूद केले. नंतर विविध स्वरुपात निवडणूक मुद्दे चर्चेत आले.

शेवटी एक संघाचा प्रमुख पदाधिकारी व भाजप जिल्हाध्यक्ष हे दोघे निवडणुकीदरम्यान संवाद ठेवतील, असे पक्के ठरले. संघाच्या विविध शाखा म्हणजे वनवासी संघ वगैरे नित्य कार्यरत असतात. या तळपातळीवार काम करणाऱ्या उपशाखा सतत सामान्य लोकांच्या संपर्कात असतात. त्यांची मदत जनतेचा कल जाणून घेण्यास होईल, असा भाजप नेत्यांना विश्वास वाटतो. त्याच अनुषंगाने भाजप संघाच्या दारी गेल्याचे म्हटल्या जाते. यावर भाष्य करण्यास नकार देणाऱ्या जिल्हाध्यक्ष गफाट यांनी अशी समन्वय बैठक झाल्याचे मात्र मान्य केले आहे.

हेही वाचा – “देश अस्थिर करण्याचा प्रयत्न”, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे वक्तव्य

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर संघ व भाजपचे दोन्ही समन्वयक पुन्हा भेटणार आहेत. संघाला शरण गेल्याशिवाय आता गत्यंतर नसल्याची बाब भाजपने स्वीकारली, हीच मोठी प्रतिक्रिया आहे.