लोकसत्ता टीम

अकोला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमापूर्वी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना पोलिसांकडून स्थानबद्ध करण्यात आले. पोलिसांनी शिवसैनिकांना राजराजेश्वर मंदिरात रोखून धरले होते. पोलिसांच्या या कारवाईवरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख व पोलिसांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. शहरात अवैध धंदे चालतात, याची माहिती मिळत नाही का? की वरती हप्ते पाठवावे लागतात? असा संतप्त सवाल आमदार नितीन देशमुख यांनी केला.

महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शनिवारी शहरात दाखल झाले. महापालिकेतील मालमत्ता कराच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांना निवेदन देण्यासाठी ठाकरे गट शिवसेनेचे पदाधिकारी जाणार होते. तत्पूर्ती, ते राजराजेश्वर मंदिरात गेले असता त्याठिकाणी पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले. याची माहिती मिळताच आमदार नितीन देशमुख यांनी तात्काळ राजराजेश्वर मंदिर गाठले.

आणखी वाचा-‘‘राजकीय स्वार्थापोटी आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे…”, रुग्णालयातील मृत्युसत्राबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? वाचा…

पक्षाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांना का स्थानबद्ध केले? असा सवाल नितीन देशमुखांनी पोलिसांना केला. त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. त्यावर नितीन देशमुख संतप्त होत कुठल्या कलमाखाली गुन्हे दाखल करणार?, शहरात अवैध धंदे करणारे आरोपी तुम्हाला दिसत नाहीत का?, शहरात दंगल होणार आहे, याची माहिती मिळाली नव्हती का? अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. शिवसैनिक आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना स्थानबद्ध केल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरात वरलीचा धंदा चालू आहे, त्यांना स्थानबद्ध करा, असे आव्हानच नितीन देशमुखांनी पोलिसांना दिले. नितीन देशमुख व पोलिसांमध्ये झालेल्या वादावादीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Story img Loader