जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी कर्मचारी लढा देत आहेत. प्रत्येक अधिवेशनात सरकारी कर्मचारी ही मागणी घेऊन आंदोलनाला बसत असतात. सध्या नागपूर येथे महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असून येथेही जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन सुरू आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना शिवसेना उबाठा गटाचा पाठिंबा जाहीर केला. मी मुख्यमंत्री असतो तर नक्कीच तुमची मागणी पूर्ण केली असती, असे ते म्हणाले. तसेच पेन्शनसाठी सरकारमधील लोकांना टेन्शन द्या, असे आवाहनही त्यांनी आंदोलकांना केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे म्हणाले, “दीड महिन्यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते मला भेटले होते. या आंदोलनाला मी नक्कीच पाठिंबा देईल, असे वचन आंदोलकांना दिले होते. पण मी आलो तर खोटं बोलणार नाही, असेही मी त्यावेळी स्पष्ट केले होते. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, अडीच वर्ष आमचे सरकार असताना पाच दिवसांचा आठवडा करण्याचा अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला विषय आम्ही मार्गी लावला. पण दुर्दैवाने करोना मरामारी आली आणि त्यानंतर काय घडले, हे आपल्याला वेगळे सांगण्याची गरज नाही.”

मी मुख्यमंत्री असतो तर..

“मी मुख्यमंत्री असताना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात चर्चा सुरू केली होती. पण गद्दारांनी गद्दारी करून आपले सरकार पाडले. जर मी मुख्यमंत्री असतो तर आजचा हा मोर्चा तुम्हाला काढावा लागला नसता”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. सरकार म्हणून आमचे चेहरे दिसतात. सरकार फक्त घोषणा जाहीर करते. पण कागदावरील घोषणा अमलात आणण्याचे काम तुम्ही (सरकारी कर्मचारी) करत असतात. एवढ्या महत्त्वाच्या घटकाला स्वतःच्या न्याय मागण्यासाठी आक्रोष करावा लागत असेल आणि गद्दारी करून स्थापन झालेले सरकार त्याकडे कानाडोळा करत असेल. तर मग नुसतं पेन्शन नाही, तर त्यांना टेन्शन देण्याची गरज आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

माझा पक्ष चोरला

“आज मी मुख्यमंत्री नाही. माझा पक्ष आणि पक्षाचे चिन्ह चोरले आहे. मी मुख्यमंत्री असतो, तर मी निर्णय घेऊ शकलो असतो. पण आज मी काहीही नसताना तुम्हाला विश्वास आणि ताकद द्यायला आहे. मी तुम्हाला शब्द देतो की, या लढ्यात शिवसेना तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. हा लढा आता जिंकल्याशिवाय थांबवायचा नाही. तुमची ताकद देशभर दिसत आहे, ही ताकद सत्ताधाऱ्यांचे डोळे विस्फारणारी आहे. निवडणूक जवळ येत आहे, त्यामुळे सरकार तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करू शकते, त्यामुळे सावध राहा”, असा सावधानतेचा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, “२०१४ सालीदेखील अच्छे दिनाचे स्वप्न दाखविले, पण प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख आले का? महागाई कमी झाली का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तसेच चार राज्यात जर बॅलेटवर मतदान घेतले असते. तर सरकारी कर्मचाऱ्यांचे सर्व मतदान सरकारच्या विरोधात गेले असते. निवडणूक आली की, केवळ रेवड्या उडवल्या जातात. गॅस सिलिंडर फुकट देऊ, हे फुकट देऊ, ते फुकट देऊ अशी आश्वासने दाखविली जातात. पण निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढविल्याचा शॉक दिला जातो. जोपर्यंत तुम्ही जीवाभावाची लोक विधीमंडळात पाठवत नाही, तोपर्यंत तुमच्या बाजूने निर्णय लागणार नाही, असेही ते म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena ubt leader meet old pension scheme protester in nagpur showed support to ops kvg