नागपूर : राष्ट्राच्या नावावर एक भाषा, एक संस्कृती, एक नेता, एक निवडणूक हे जे काही आज चालले आहे ते म्हणजे राष्ट्र नव्हे. राष्ट्र निर्माण म्हणजे सिमेंट रस्ते, रेल्वे, मेट्रो, बंदर उभारणी नव्हे. राष्ट्र निर्माण म्हणजे, बंधूभाव, विविध भाषा, संस्कृतीचा आदर हे आहे, असे प्रतिपादन साहित्यिक-समीक्षक श्रीपाद जोशी यांनी केले.

समाजविज्ञान अकादमी, पुणे आणि भगतसिंग विचार मंच, नागपूर यांच्या संयुक्त विद्यामाने ‘बदलता भारत’या ग्रंथाचा लोकार्पण कार्यक्रम प्रेस क्लब, सिव्हिल लाईन्स येथे शनिवारी झाला. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात प्राध्यापक-सामाजिक कार्यकर्ते अजित अभ्यंकर, बदलता भारतचे संपादक दत्ता देसाई, लेखक हेमंत राजोपाध्याय उपस्थित होते.

हे ही वाचा…नागपूर: पैसे भरूनही ऐनवेळी एअर अँम्बुलन्स कंपन्यानी दिला धोका, माजी कुलगुरूंच्या उपचारासाठी धावाधाव

जोशी म्हणाले, साहित्य, संस्कृती, नृत्य, व्यापार, औद्याोगिकरण, आर्थिक व्यवहार, राजकारणातील मुद्दे, लोक व्यवहार हे आणि असे अनेक विषय राष्ट्रवादाशी निगडीत असतात अशी नाविण्यपूर्ण आणि विचारप्रेरक मांडणी ‘बदलता भारत’या ग्रंथाची आहे. या ग्रंथाने ज्ञानाच्या संस्कृतीत मोलाची भर घातली आहे. या ग्रंथात आधीचा भारत, वर्तमानातील भारत आणि भविष्यातील भारत याचे उत्तम विवेचन करण्यात आले आहे. ही मराठी भाषेसाठी मोठी देणगी आहे. या ग्रंथात राष्ट्र आणि राष्ट्रवादाच्या संकल्पनाही विस्तारल्या आहेत.

दत्ता देसाई म्हणाले, राष्ट्रवाद, भारतीयता, स्वातंत्र्य म्हणजे काय? आज जे काही बरं वाईट घडत आहे ते कशामुळे घडत आहे? ते थांबवून भारताला महासत्ता बनण्यासाठी काय करावे लागेल या बद्दलची मांडणी या ग्रंथात करण्यात आली आहे. या ग्रंथावर सुमारे तीन साडे तीन वर्षे काम चालले. ६० हुन लेखकांचा सहभाग या ग्रंथाच्या आकारणीत आहे. विविध विषयांवर लेखनाचा हातखंडा असलेले लेखकांनी संपादकांच्या कल्पनेनुसार लिहिण्याचा मराठी भाषेतील हा कदाचित पहिलाच प्रसंग असावा, यातून लेखकांची त्यांच्या कामाप्रति निष्ठा असल्याशिवाय हे नव्हते, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा…नागपूरच्या महापुराची वर्षपूर्ती! भय इथले संपत नाही…

हेमंत राजोपाध्याय यांनी ग्रंथाच्या मुखपृष्ठावर भाष्य केले. मुखपृष्ठावर तिरंगा आणि राष्ट्रचक्र वेगवेगळे दर्शवले आहे. राष्ट्रचक्र गळून पडले असून त्याची आपल्याला पुन्हा प्रतिष्ठापना करायची आहे, असा संदेश यातून द्यायचा आहे, असे राजोपाध्याय म्हणाले. संचालन गुरप्रितसिंग यांनी केले.

हे ही वाचा…Ladki Bahin Yojana : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरलेल्या अर्जाचे पैसे कधी येणार? लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांनी दिली माहिती

संविधानिक मूल्ये पायदळी

अजित अभ्यंकर म्हणाले, सध्याचे राजकारण मिथक आणि कल्पनेवर आधारित आहे. जाणीवपूर्वक मिथक तयार केले जातात आणि त्यातून संविधानिक मूल्यांना पायदळी तुडवले जाते. आज आपल्याला संविधानिक मूल्य टिकवण्यासाठी झटायचे आहे.