राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून उपराजधानी नागपुरात सुरू होत आहे. तत्पूर्वी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस सत्ताधारी विरुद्ध विरोधकांमध्ये पत्रकारपरिषदेच्या माध्यमातून टीका, टिप्पणीला सुरूवात झाल्याचे आज दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी आज पत्रकारपरिषदेतून विविध मुद्य्यांवरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांन यावेळी राज्य सरकारवर निशाणा साधला. त्यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या पत्रकारपरिषदेतून उत्तर दिलं. मागील दोन वर्षांत करोनामुळे हिवाळी अधिवेशन नागपुरात झाले नव्हते. मात्र यंदा हे अधिवेश नागपुरात होत आहे. यावरून फडणवीसांनी महाविकास आघाडीला यावेळी चिमटा काढल्याचे दिसून आले. देवेंद्र फडणवीस पत्रकारपरिषदेच्या सुरुवातीस म्हणाले, “हिवाळी अधिवेशनाच्या निमित्त मुख्यमंत्र्यांच्यावतीने सर्वांचे मी नागपुरमध्ये मनापासून स्वागत करतो. यासोबत विरोधी पक्षनेते अजित पवार, वरिष्ठ सभागृहाचे विरोधी पक्षनेते आणि संपूर्ण विरोधी पक्षाचंही स्वागत करतो. कारण, तीन वर्षानंतर त्यांनाही नागपुरमध्ये येण्याची संधी मिळाली. आमचं सरकार आलं नसतं तर कदाचित याही वर्षी नागपूर अधिवेशनाच्या निमित्त करोना वर आला असता आणि हे अधिवेशन झालं नसतं.” हेही वाचा - “छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावा मागणारे, मांडीला मांडी लावून बसतात आणि…” फडणवीसांचे अजित पवारांना प्रत्युत्तर! याशिवाय, “पण मला आज अतिशय आनंद वाटला, की अजित पवारांना विदर्भाची आठवण आली. तीन वर्ष आली असती… म्हणजे मुंबईमध्ये करोना नव्हता त्यामुळे अधिवेशन होत होतं आणि नागपुरमध्ये करोना होता त्यामुळे अधिवेशन होत नव्हतं. अशी विडंबनादेखील आपण मागील काळात बघितलेली आहे.” असंही यावेळी फडणवीसांनी म्हटलं. अजित पवार काय म्हणाले? - “अधिवेशन नागपुरात होत असताना, विदर्भातील अनुशेष हा सर्व स्तरावरील वाढतो आहे. त्या बद्दल ठोस अशी भूमिका हे सरकार घेताना दिसत नाही. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा मिळत नाही. खरेदी केंद्र व्यवस्थितरित्या सुरू केली जात नाहीत, हेपण या सरकारचं अपयश आहे. आम्ही राज्यकर्ते म्हणून काम करत असताना असा दुजाभाव करत नव्हतो. शेवटी ज्या भागात पीक अमाप असेल, त्या भागात खरेदी केंद्र सुरू झाली पाहिजेत.” असं अजित पवार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आहेत.