नागपूर: सर्व सामान्य माणसांचे जगण्याचे प्रश्न फक्त दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींपुरतेच मर्यादित नसून ते त्या पलिकडचेही आहेत याचा प्रत्यय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनता दरबारात रविवारी आला. या जनता दरबारात युवकांपासून वृद्धांपर्यंत सर्वच नागरिकांचे वेगवेगळे प्रश्न होते. पण एका वृद्ध दाम्पत्याने मांडलेली समस्या सर्वाचे लक्ष वेधून घेणारी ठरली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरमध्ये नियमितपणे जनता दरबार आयोजित करून लोकांच्या तक्रारी, गाऱ्हाणे ऐकतात, ते कधी प्रशासकीय चौकटीत राहून तर कधी त्याबाहेर जाऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या जनता दरबारात सर्वसामान्य जनतेची गर्दी होते. कोणी रोजगारासाठी येतो तर कोणी महापालिका, सुधार प्रन्यास किंवा अन्य विभागाच्या समस्यांकडे लक्ष वेधतो. हेही वाचा >>> साडेचार क्विंटल गोमांसाची तस्करी, दोन आरोपी ताब्यात रविवारी (८ ऑक्टोबर) त्यांच्याकडे आलेल्या वृ्ध्द दाम्पत्याने गडकरींना मुलाच्या बदलीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. ते म्हणाले “ साहेब, आमच्या मुलाला घरापासून लांब नोकरी आहे. आम्ही दोघेही वृद्ध असून घरी एकटेच असतो. विविध आजारांनी आम्हाला ग्रासले आहे. आपण पुढाकार घेऊन मुलाच्या नागपुरातील बदलीसाठी प्रयत्न करा” गडकरी यांनी. या वृद्ध दाम्पत्याचा अर्ज स्वीकारला. शक्यता तपासून सहकार्य करण्याच्या सूचना त्यांनी सर्वसंबंधितांना दिल्या.