नागपूर : रेल्वेगाड्यांची टक्कर टाळण्यासाठी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने नागपूर-बिलासपूर- झारसुगुडा या दरम्यान ‘कवच’ प्रणाली बसवण्याचा प्रस्ताव रेल्वेबोर्डाला पाठवला आहे.  पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात अलीकडेच मालगाडीने कांचनगंगा एक्स्प्रेसला धडक दिल्यानंतर ‘कवच’ प्रणाली पुन्हा चर्चेत आली. त्या पार्श्वभूमीवर दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने हा प्रस्ताव सादर केला आहे. सध्या महाराष्ट्रातील कुठल्याही रेल्वे मार्गावर ‘कवच’ प्रणाली नाही. 

रेल्वेगाड्यांची टक्कर टाळण्यासाठी ‘कवच’ ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ‘कवच’ ही एक स्वयंचलित (एटीपी) प्रणाली आहे. चालकाने वेळेवर ‘ब्रेक’ लावला नाही तर गाडीचा वेग नियंत्रित करणे हे या प्रणालीचे काम आहे. कवचद्वारे चालकांना रेल्वेमार्गावरील धोक्याचे सिग्नल ओळखण्यात मदत मिळते. कमी दृश्यमानतेच्या ठिकाणी गाडी चालवण्यासही मदत होते. ‘कवच’ प्रणाली ज्या मार्गावर कार्यान्वित केली जाते, त्या मार्गावरील गाडी सुरक्षितपणे जाऊ देण्यासाठी पाच किलोमीटरच्या आत असलेल्या सर्व गाड्या थांबवल्या जातात. रेल्वे इंजिनमध्ये असलेल्या डिजिटल बोर्डवरील सूचनांचा वापर करून चालक अधिक अचूकतेने धोक्याचे सिग्नल वाचू शकतो, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हेही वाचा…उत्तर प्रदेशात प्रश्नपत्रिका फोडल्यास आजन्म कारावास, महाराष्ट्रात असा कायदा पावसाळी अधिवेशनात…

कवचची यशस्वी चाचणी दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागात लिंगमपल्ली-विकाराबाद सेक्शनमध्ये गुल्लागुडा-चिटगिड्डा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मार्च २०२२ मध्ये करण्यात आली होती. 

दरम्यान, अलिकडे पश्चिम बंगालच्या रानीपात्रा रेल्वे स्थानक आणि छत्तर हाट रेल्वे स्थानक दरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणेतील बिघाड झाला. त्यामुळे कांचनगंगा एक्स्प्रेस राणीपात्रा रेल्वे स्टेशन व छत्तरहाट रेल्वे स्थानकादरम्यान थांबली होती. त्यानंतर रानीपात्रा रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्टरने कांचनगंगा एक्स्प्रेसला ‘टीए ९१२’ जारी केला. त्यानंतर सकाळी ८.४२ वाजता रंगापानी येथून निघालेल्या मालगाडीने कांचनगंगा एक्स्प्रेसला धडक दिली होती. 

हेही वाचा…मेट्रोला दिलेल्या भूखंडांचे भाडे पाच वर्षांसाठी माफ! एनआयटीकडून राज्य शासनाला प्रस्ताव

कवच नव्हते

या मार्गावर कवच यंत्रणा नव्हती. देशात आतापर्यंत १५०० किमी रेल्वेवर कवच यंत्रणा बसवण्यात आली आहे.  या मार्गावर कवच ही टक्कर विरोधी यंत्रणा असती तर हा अपघात टाळता आला असता, असे सांगण्यात येत आहे. 

हेही वाचा…प्रेमविवाहाचा रक्तरंजित अंत; अनैतिक संबंध उघडकीस येताच पतीने पत्नीला संपवले

 “दक्षिण- पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर-बिलासपूर- झारसुगुडा सेक्शनमध्ये ‘कवच’ प्रणाली बसवण्याचा प्रस्ताव रेल्वेबोर्डाला (दिल्ली) पाठवण्यात आला आहे. प्रस्ताव स्वीकारण्यात आल्यानंतर नागपूर-रायपूर-बिलासपूर- झारसुगुडा या दरम्यान कवच सुरक्षा प्रणाली बसण्याचे काम सुरू केले जाईल.” – दिलीप सिंह, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे.