वाशिम: जिल्ह्यातून जाणाऱ्या-अकोला नांदेड महामार्गावर मोठंमोठे स्ट्रीट लाईट लावण्यात आले आहेत. हा महामार्ग शेताजवळून गेलेला असल्याने पिकांवर दिवसा सूर्यप्रकाश तर रात्री दिव्यांचा प्रकाश पडत आहे. यामुळे किडे प्रकाशाकडे आकर्षित होत असून पीक परागीकरण प्रक्रिया थांबली आहे. परिणामी पिकांना फुल धारणा व शेंगाच उगवत नसल्याने जिल्ह्यातील जवळपास शंभर एकर पेक्षा अधिक क्षेत्रावरील सोयाबीन पिके धोक्यात आली आहे.

वाशिम जिल्ह्यातील अकोला ते नांदेड या चौपदरीकरण महामार्गावर लावण्यात आलेल्या दिव्यांच्या प्रकाशाचा फटका पिकांना होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. या महामार्गावर जवळपास दोनशे फूट परिसरात दिव्याच्या प्रकाशामुळे पिकांना हानी होत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा… कुणबी-ओबीसी संघटनामध्ये मतभेद? विशाल मोर्चानंतर नेमके काय घडले…

जिल्ह्यातील जेथे जेथे उड्डाण पूल आहेत. त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट लावण्यात आले आहेत. त्या परिसरातील पिकांची वाढ होत आहे. मात्र फुल धारणा होत नसून पिकांना शेंगा आलेल्या नसल्याची तक्रार शेतकरी वर्गातून झाल्यानंतर कृषी विभागाकडून देखील काही ठिकाणी पाहणी करण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत कृषी विज्ञान केंद्रातील कृषी शास्त्रज्ञ भारत गीते यांना विचारणा केली असता रस्त्यावरील दिव्यामुळे जवळच्या पिकांची हानी होत असल्याचे सांगून पिके वाढत आहेत परंतु त्याला फुले व शेंगाचं लागत नसल्याचे सांगितले. आधीच दुष्काळी परिस्थिती असताना आता नवीनच संकट शेतकऱ्यावर उद्भवले असून याबाबत प्रशासनाने तातडीने योग्य ती पावले उचलण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Story img Loader