नागपूर : मराठा आरक्षण आंदोलनामुळे सलग चार दिवस नागपूरहून मराठवाड्याला जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या मधेच वा पूर्णत: रद्द झाल्या होत्या. मंगळवारी पुणे आणि मराठवाड्यातील विविध ठिकाणी निघालेल्या बसेस सुरळीत पोहोचल्या. त्यामुळे एसटीचे परिचालन आता सुरळीत झाले आहे. जालन्यातल्या अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाची मागणी करत उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यानंतर आंदोलक संतप्त झाल्याने एसटीच्या २० बसेस पेटवण्यात आल्या. आंदोलनामुळे मराठवाड्यातील ४६ आगार पूर्णत: बंद होती.
आंदोलनामुळे नागपूरहून पुणे आणि मराठवाड्यातील विविध ठिकाणी जाणाऱ्या आठ बस फेऱ्या मधेच रद्द वा पूर्णपणे रद्द झाल्या. त्यामुळे चार दिवसांत नागपूर विभागातील १४ हजार १४१ किलोमीटरच्या फेऱ्या रद्द झाल्याने एसटीला लक्षावधींचा फटका बसला. दरम्यान एसटीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (५ सप्टेंबर) नागपूरहून छत्रपती संभाजीनगर ३, सोलापूर १, अंबेजोगाई १, पुणे २, पंढरपूर १ अशा एकूण ८ बसेस पुन्हा सोडल्या. या सर्व बसेस निश्चित ठिकाणी पोहचल्या. बुधवारीही या फेऱ्या नागपूरहून निघाल्याची माहिती लोकसत्ताशी बोलताना एसटी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभने यांनी दिली.