नागपूर: शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी केलेल्या संपामुळे एसटीची आर्थिक स्थिती ढासळली होती. आता स्थिती रूळावर येत असतानाच कामगारांच्या आर्थिक प्रश्नावर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने ११ सप्टेंबरपासून मुंबईत तर १३ सप्टेंबरपासून जिल्हा स्तरावर बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या कोअर कमेटीची बैठक नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे झाली. यावेळी कामगार करारातील तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे देय ४२ टक्के महागाई भत्ता त्वरीत लागू करावा, प्रलंबित महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर यांचा फरक त्वरीत अदा करावा, मुळ वेतनात जाहीर झालेल्या पाच हजार, चार हजार, अडीच हजार रुपयांमुळे सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात निर्माण झालेली विसंगती दूर करण्याची मागणी शासनाकडे केली गेली.
हेही वाचा – कोल्हापूरमधील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प कार्यान्वित, किती शेतकऱ्यांना लाभ पहा…
सोबत ४ हजार ८४९ कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप त्वरीत करा, दहा वर्षांसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा, अपहार प्रवण वाहकांचे बदली धोरण रद्द करा, खाजगी गाड्यांऐवजी स्वमालकीच्या नवीन बसेसचा पुरवठा त्वरीत करावा, लिपिक-टंकलेखक पदाच्या बढतीसाठी २४० हजर दिवसांची अट रद्द करा, सेवानिवृत्तांना पत्नीसह व विद्यमान कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या गाड्यांचा वर्षभर मोफत फॅमिली पास देण्यात यावा यासह इतरही मागणी केली गेली.
या मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे ११ सप्टेंबरपासून तर राज्यभरातील विभागीय पातळीवर १३ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण केले जाणार असल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी सांगितले. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तिव्र होण्याचाही इशारा त्यांनी दिला.