लोकसत्ता टीम

अकोला : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. मूर्तिजापूर येथे राष्ट्रवादी पवार गटाचा उमेदवार जाहीर होताच नाराजी व्यक्त करून पक्षाला सोडचिठ्ठी देणारे रवी राठी यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश घेतला. मूर्तिजापूरमध्ये भाजप उमेदवारीसाठी आणखी स्पर्धा वाढली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर जोरात सुरू आहे. प्रहार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी बच्चू कडूंची साथ सोडून हातात कमळ घेतले. गेल्या काही दिवसांपासून ते भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. अखेर आज त्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश घेतला. २०१४ मध्ये अनिल गावंडे यांनी अकोट विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना २८ हजार १८३ मते मिळाली होती. त्यानंतर त्यांनी प्रहार पक्षात प्रवेश घेतला. बच्चू कडूंनी त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. आता त्यांनी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश घेतला. अनिल गावंडे अकोट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होते. मात्र, अकोटमधून विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता त्यांना भारसाकळे यांचा प्रचार करावा लागणार आहे.

आणखी वाचा-स्वत: खासदार झाले, आता आमदारकीसाठी पत्नीला तिकीट… काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी फेरून…

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मूर्तिजापूर मतदारसंघात उमेदवार जाहीर करताच पक्षात फूट पडली. उमेदवारीवरून नाराजी व्यक्त करीत राष्ट्रवादीचे प्रदेश संघटन सचिव रवी राठी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. सम्राट डोंगरदिवे यांना उमेदवारी दिल्यावरून गेल्या वेळेस राष्ट्रवादीकडून लढणारे उमेदवार तथा प्रदेश संघटन सचिव रवी राठी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवला. त्यानंतर रवी राठी यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये भाजपमध्ये प्रवेश घेतला.

आणखी वाचा- काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षाला मतदारसंघ मिळेना… पक्षाने मुलालाही वाऱ्यावर सोडल्याने…

मूर्तिजापूरमध्ये उमेदवारीसाठी चुरस

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपचे हॅट्‌ट्रिक साधलेले विद्यमान आमदार हरीश पिंपळे उमेदवारीसाठी प्रतीक्षेत आहेत. त्यांच्याविरोधात नाराजी असल्याने पक्षाकडून तिकीट कापले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता रवी राठी भाजपमध्ये राखल झाल्याने मूर्तिजापूर मतदारसंघात उमेदवारीसाठी तीव्र चुरस निर्माण झाली आहे.