राज्य शासन नागरिकांना घरकूल उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने ‘नमो आवास’ घरकूल योजना सुरू केली आहे. याअंतर्गत येत्या तीन वर्षात राज्यात १० लाख घरे निर्माण करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीद्वारे आयोजित सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमात ते बोलत होते. प्रियदर्शनी सभागृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जान्सन, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, माजी जी.प.अध्यक्ष संध्या गुरनुले, अति जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी सुभाष पवार, उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक, कृषी अधिकारी बऱ्हाटे, आत्माच्या प्रमुख प्रीती हराळकर, समाज कल्याण सहा.आयुक्त अमोल यावलीकर, वाकुलकर, सुरेश पेंदाम आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>>सूर्य कोपला! चंद्रपूर ४३.२ अंशांवर, राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद

मुनगंटीवार म्हणाले, सर्वांना हक्काचे घर मिळाले पाहिजे, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. यशवंतराव मुक्त वसाहत योजनेंतर्गत विशेष बाब म्हणून २८०३ घरे मंजूर करण्यात आली आहेत. महाप्रित अंतर्गत म्हाडामध्ये १० हजार घरे बांधण्यात येणार आहेत. याबाबत नुकताच चंद्रपूर मनपा आणि महाप्रित यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा आहे. त्यामुळे वाघाच्या गतीनेच शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या यशोगाथा पुस्तिकेचे तसेच विभागाच्या योजनांची माहिती असलेल्या पॉकेट डायरीचे विमोचन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले. संचालन सचिन फुलझेले यांनी तर आभार पूनम आसेगावकर यांनी मानले.

हेही वाचा >>>खेळाडूंसाठी आनंदवार्ता! महाराष्ट्रात पुन्हा रंगणार चेस लीग स्पर्धा; ग्रँडमास्टर अभिजित कुंटे म्हणाले, पाचवा ‘सिझन’…

पालकमंत्र्यांच्या हस्ते ३१ लाभार्थ्यांना धनादेश, प्रमाणपत्र, साहित्य वाटप

सामाजिक न्याय पर्वानिमित्त पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश, प्रमाणपत्र, साहित्य वाटप करण्यात आले. यात अतिवृष्टीमुळे अंशत: घराचे नुकसान झालेल्या आबाजी भोयर, दिवाकर धांडे यांना तर राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत अर्चना रायपुरे यांना धनादेश देण्यात आला. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, महाज्योती जेईई, नीट पूर्व प्रशिक्षण टॅब वाटप, मिनी ट्रॅक्टर वाटप, दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी अर्थसहाय्य, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, माझी कन्या भाग्यश्री ३१ लाभार्थ्यांना धनादेश व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.