नागपूर : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षासह महायुतीला मिळालेले अपयश बघता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळे करण्यात यावे, अशी मागणी वरिष्ठांकडे करून राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे फडणवीस समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ नये आणि दिला तर आम्ही आमच्या पदाचे राजीनामे देऊ, अशी घोषणा नागपूर शहर अध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात भाजपला मिळालेल्या अपयशानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. यानंतर शहर अध्यक्ष बंटी कुकडे म्हणाले, फडणवीस आमचे नेते आहेत. महाराष्ट्रात जे काही अपयश आले आहे ती त्यांची एकट्याची नाही तर प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. त्यांनी राजीनामा दिला तर आम्ही आमच्या पदाचे राजीनामे देऊ. महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी त्यांच्याशिवाय पर्याय नाही, असेही बंटी कुकडे म्हणाले. आमादार प्रवीण दटके म्हणाले. राज्यातील पराभावाची जबाबदारी त्यांची एकट्याची नाही तर आमचीही आहे. पराभव स्वीकारण्यासाठी हिंमत लागते आणि त्यामुळे त्यांना सलाम आहे. मात्र त्यांनी सरकारमध्ये राहून पक्षाचे आणि उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व करावे. देवेंद्र फडणवीस तरुणांचे आयकॉन आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांच्यासोबत काम करुन मोठा विजय मिळवणार, असल्याचे दटके म्हणाले.

हेही वाचा – यवतमाळ : ‘माहेरच्या ऋणाईतच राहील’, महायुतीच्या राजश्री पाटील यांचा विधानसभेपाठोपाठ लोकसभेतही पराभव

फडणवीस यांचे खंदे समर्थक किशोर वानखेडे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात दिवस रात्र काम केले. निवडणुकीत यश अपयश येत असते. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देता सरकारमध्ये राहून पक्ष संघटनेचे काम करत पक्षाचे आणि महाराष्ट्राचे नेतृत्व करावे.
पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीश व्यास म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे तरुणाचे जाणता राजा आहेत. त्यांनी राज्यातील भाजपचा पराभव मनावर घेतला आहे. मात्र ते लढवय्ये नेते आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा न देता पक्षाचे आणि राज्याचे नेतृत्व करावे. विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांच्यासोबत राहून पक्ष संघटन वाढविण्यासोबत निवडणुकीत मोठे यश मिळवू. मात्र त्यांनी सरकारमध्ये राहून पक्षाचे काम करावे असेही गिरीश व्यास म्हणाले.

हेही वाचा – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा व गोंदिया विधानसभेत महायुती, तर अर्जुनी मोरगावमध्ये आघाडीला मताधिक्य

माजी महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस पक्षाचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी आहेत. जे अपयश आले त्याची जबाबदारी एकटे फडणवीस यांची नाही तर ती प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याची आहे. त्यामुळे सरकारमधून बाहेर न पडता पक्षाचे काम करावे. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supoorters comment on devendra fadnavis offer to resign vmb 67 ssb
Show comments