नागपूर: मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात मराठवाड्यात लोकप्रतिनिधींच्या घरांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेचा तेली समाजाने जाहीर निषेध करत एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या घटनेत दोषी असणाऱ्यांवर कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरू व त्याची जबाबदारी शासनाची असेल, असा निर्वाणीचा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

निवेदनात असे म्हटले आहे की, “मराठा समाजाच्या आरक्षणास तेली समाजाचा विरोध नसतानाही मराठा आंदोलकांनी अखिल भारतीय तैलिक शाहू सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यालयाची तोडफोड करुन, त्यांचे घर पेटवले तसेच त्यांच्या चारचाकी गाड्यांचीसुद्धा तोडफोड केली. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे राज्य अध्यक्ष व भाजपा खासदार रामदास तडस, सरचिटणीस डॉ. भूषण कर्डिले, कोषाध्यक्ष गजानन शेलार यांनी या हल्ल्याच्या निषेध केला. तसेच राज्य सहसचिव बळवंत मोरघडे यांचे नेतृत्वात एक शिष्टमंडळ बुधवारी दुपारी ३ वा नागपूरचे जिल्ह्याधिकारी डॉ. विपीन इटनकर, यांना भेटले व त्यांच्या मार्फत निषेधाचे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले. या प्रकरणात सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा आम्हाला आमचे आरक्षण व स्वरक्षणासाठी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरावे लागेल, यास शासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला.

हेही वाचा – कालेश्वरम प्रकल्प म्हणजे ‘केसीआर फॅमिली एटीएम’, राहुल गांधींचे टीकास्र; मेडीगड्डा धरणाला भेट

हेही वाचा – नागपूर : आईचा मृत्यू; विरहात मुलाची आत्महत्या

शिष्टमंडळात नागपूर शहरातील महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाचे पदाधिकारी सर्वश्री प्रा. कुणाल पडोळे, प्रा. राजेंद्र झाडे, मंगलाताई मस्के, राजेश बारुटकर, जयश्री गभने, किशोर वर्भे, देवेंद्र काळबांडे, रमेश उमाटे, निखिल भुते, प्रमोद क्षीरसागर, वैभव गोल्हर, रुपेश कुबडे, पीयूष आकरे, उपस्थित होते.

Story img Loader