अकोला : समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र थांबता-थांबत नसल्याचे चित्र आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला. धावत्या ट्रकला भरधाव कारने मागील बाजूने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कार चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना १७ ऑक्टोबर रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील लोकेशन १८२ वर घडली. बळीराम ग्यानबा पिसे (२४, रा. शिवनी (पिसा ) ता. लोणार जि. बुलढाणा) असे मृतकाचे नाव आहे.

समृद्धी महामार्गावर नागपूरवरून लोणारकडे मोटारीने (क्र. एमएच ४३ बीयू ०३६१) बळीराम पिसे हे जात होते. भरधाव मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने ती समोर धावणाऱ्या एका वाहनावर जाऊन धडकली. यावेळी प्रचंड मोठा आवाज झाला. वालई येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे सेवक रमेश देशमुख यांना देण्यात आली. त्यांनी समृद्धी महामार्ग लोकेशन १०८ चे पायलट विधाता चव्हाण व डॉ. गणेश यांना यांना तात्काळ घटनास्थळी पाचारण केले. सर्वधर्म आपत्कालीन संस्थेच्या रुग्णवाहिकेचे सेवक दीपक सोनोने रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात अतिशय भीषण होता. विचित्र पद्धतीने मोटार ट्रकवर आदळली होती.

हे ही वाचा…अवकाळी पावसाचे संकट! राज्यात येत्या २४ तासात…

या घटनेत मोटार चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भीषण अपघातात मोटार चक्काचूर झाली. चालकाचा मृतदेह अपघातग्रस्त मोटारीत अडकला होता. समृद्धी महामार्गाच्या अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढला. यावेळी समृद्धी महामार्ग एसएसपी पोलीस व महाराष्ट्र सुरक्षा रक्षक चमू उपस्थित होता. अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

हे ही वाचा…गुन्हा नसताना १९ दिवस कारागृहात डांबले, ४३ वर्षे जुनी फाईल बंद करण्याच्या नादात पोलिसांनी…

अपघात रोखण्याच्या उपाययोजना कुचकामी

जलद अंतर पार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र, या महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना घडत असल्याने तो वादात सापडला. समृद्धी महामार्गावर उद्घाटनापासून आतापर्यंत तब्बल १७ हजारावर अपघात झाले आहेत. त्यामध्ये शेकडो प्रवाशांच्या जीव गेला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करून देखील अद्यापही त्याचे प्रमाण कमी झालेले नाही. अपघात रोखण्याच्या उपाययोजना कुचकामी ठरत असल्याचे स्पष्ट होते.