अमरावती: दुचाकींची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी दुपारी शिरजगाव कसबा-देऊरवाडा मार्गावरील वळणावर घडला.

कुणाल नरेश भुते (१८) व शेख मुस्ताक शेख गौसुद्दीन (३२) दोघेही रा. देऊरवाडा अशी मृतांची तर विनोद रामकृष्ण फिसके (३५) रा. देऊरवाडा व सारंग नामदेव संभे (१८) रा. शिरजगाव कसबा अशी जखमींची नावे आहेत. शनिवारी दुपारी शिरजगाव कसबा-देऊरवाडा मार्गावरील वळणावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील कुणाल व शेख मुस्ताक यांचा मृत्यू झाला. तर विनोद व सारंग हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच शिरजगाव कसबा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व गंभीर जखमी विनोद व सारंगला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. शिरजगाव पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा >>>सुधीर मुनगंटीवार यांना डी.लिट. म्हणजे चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

नैसर्गिक मृत्यू किंवा आजाराने मृत्यू होणाऱ्यांच्या तुलनेत रस्त्यावर होणाऱ्या वाहन अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे.  गेल्या सहा महिन्यांत १४६ प्राणांतिक अपघात होऊन त्यांत १६६ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात अलीकडच्या काळात राष्ट्रीय, राज्य महामार्गाचे जाळे मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. त्यामुळे वाहनांचा वेगही वाढला आहे. अनेकदा दुचाकी वाहनचालक वाहतूक नियम न पाळता वाहने चालवितात. त्यातून अपघातांची संख्या वाढली आहे.

हेही वाचा >>>काँग्रेस इंग्रजांप्रमाणेच देशाला लुटण्याचा विचार करते….बंजारा समाजाविषयी सदैव अपमानजक….पोहरादेवीत पंतप्रधानांचा घणाघात….

अपघाती मृत्यूसंख्या लक्षात घेता दरदिवशी सरासरी अपघातात एकाचा मृत्यू तर तिघे जखमी होतात. अपघातामुळे होणारे नुकसान दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे तंतोतत पालन करून अपघात टाळण्याची गरज आहे.  जिल्‍ह्यात रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त पोलिसांच्या वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात  प्रयत्न केले जातात. या प्रकारची शासकीय जनजागृती या विभागाकडून दरवर्षीच केली जाते. वर्षांतून एकदा जनजागृती करूनही अपघातांची संख्या तसेच अपघाताने मृत्यूमुखी पडणाऱ्या जखमींची संख्या वाढत आहे. शासकीय यंत्रणा केवळ जनजागृती करू शकते मात्र प्रत्येक वाहनचालकाने नियमांचे पालन केले तर अपघात निश्चितच कमी होतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.