अमरावती : पश्चिम विदर्भातील सिंचनाचा अनुशेष कायम असतानाच विदर्भातील प्रगतीपथावरील १८ मोठ्या प्रकल्पांची किंमत ६५ हजार कोटींवर पोहोचल्याचे वास्तव समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अहवालानुसार महामंडळाच्या अखत्यारीतील एकूण बांधकामाधीन १८ मोठ्या प्रकल्पांची अद्ययावत किंमत आता ६५ हजार ८२ कोटी रुपयांवर पोहोचली असून हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी ३० हजार ३६४ कोटी रुपये लागणार आहेत. अनुशेष निर्मुलन कार्यक्रमातील प्रकल्पदेखील रखडले आहेत. अशा स्थितीत हे प्रकल्प केव्हा पूर्णत्वास जातील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा – गणेशोत्सवावर महागाईचे ‘विघ्न’, मूर्तीच्या किंमतीत ३० टक्क्यांनी वाढ

विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी योग्य वेळी पुरेशा प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात न आल्याने प्रकल्पांची किंमत वाढत गेली आणि हे प्रकल्प रखडत गेले, असा आक्षेप घेतला जातो. निर्देशांक व अनुशेष समितीने १९९४ या आधार वर्षांत काढलेला अमरावती विभागाचा भौतिक अनुशेष अद्यापही दूर होऊ शकलेला नाही. जून २०१२ रोजी अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशीम या चार जिल्ह्यांचा शिल्लक भौतिक अनुशेष हा २ लाख ३४ हजार हेक्टरचा होता. राज्यपालांच्या निर्देशानुसार २०१२ मध्ये १०२ प्रकल्पांचा समावेश असलेला अनुशेष निर्मुलन कार्यक्रम तयार करण्यात आला. गेल्या दहा वर्षांमध्ये तो दूर झालेला नाही. अजूनही ७३ हजार हेक्टरचा अनुशेष शिल्लक आहे. आता सुधारित अनुशेष निर्मुलन कार्यक्रम तयार करण्यात आला असून तो जून २०२५ पर्यंत दूर होणे अपेक्षित आहे. हा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी सुमारे ३० ते ५० हजार हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण करावी लागणार आहे.

विदर्भात बांधकामाधीन १८ मोठ्या प्रकल्पांमुळे तब्बल १२ लाख २२ हजार ५४७ हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. त्यात सर्वाधिक २ लाख ५० हजार हेक्टरची सिंचन क्षमता गोसेखुर्द प्रकल्पाची आहे. गोसेखुर्द प्रकल्पाची उर्वरित किंमत ३ हजार ८८५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हुमन प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी १ हजार ८४८ कोटी रुपये लागणार आहे. तुलतुली प्रकल्पाची उर्वरित किंमत १२.९४ कोटी, निम्न वणा २४.३० कोटी, उर्ध्व वर्धा १२८.६९ कोटी, निम्न वर्धा ४१७.५७ कोटी, बेंबळा ३६४.५० कोटी, वान ५.७७, बावनथडी ६ कोटी, जिगाव ८ हजार ५२७ कोटी, निम्न पैनगंगा १० हजार ६७ कोटी, अरुणावती ७५.७६ कोटी, पेनटाकळी ३२८ कोटी, आजनसरा ८४७ कोटी, पेंच १३८.४८ कोटी, निम्न पेढी ६०३.९४ कोटी तर धापेवाडा टप्पा २ या सिंचन प्रकल्पाची उर्वरित किंमत ३ हजार ८३ कोटी रुपये इतकी आहे.

हेही वाचा – आरक्षणाच्या मुद्यावर जाती जातीत, समाजा समाजात विष कालवण्याचे व भांडणे लावण्याचे काम – नाना पटोले

याशिवाय प्रगतीपथावरील ४० मध्यम प्रकल्पांची अंदाजित किंमत १६ हजार ५७८ कोटी असून हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७ हजार ७ कोटी रुपये लागणार आहेत. एकूण १२४ लघू प्रकल्पांचा खर्च ९ हजार ९४४ कोटी रुपयांवर पोहोचला असून या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी आणखी ३२० कोटी रुपये लागणार आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The cost of major irrigation projects in vidarbha has reached 65 thousand crores mma 73 ssb
Show comments