नागपूर : भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील तिसऱ्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प मंगळवारी २३ एप्रिल रोजी सादर होणार आहे. विदर्भातील बेरोजगारीचे आणि प्रदुषणाचे प्रमाण लक्षात घेता या भागात रोजगार वाढवणारे आणि प्रदूषण कमी करणारे प्रकल्प सुरू करावे, अशी वैदर्भीयांची अपेक्षा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधून तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर मतदारांचे आभार व्यक्त करताना विदर्भातील बेरोजगारी दूर करण्याला व प्रदुषण कमी करण्याला प्राधान्य देणार, असे जाहीर केले होते. त्यानंतर सादरहोणारा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. विदर्भात सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नाही, त्यांना परराज्यात किंवा मुंबई,पुण्याकडे धाव घ्यावी लागते. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाण आहे, समृद्धी महामार्ग, विमानसेवा अशी दळणवळणाची भरघोस साधणे असूनही विदर्भ औद्योगिकदृष्या मागासलेला आहे. येथे रोजगार निर्मिती करणारा मोठा प्रकल्प सुरू करण्याबाबत केंद्राने अर्थशंकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा >>>वीज निर्मिती विदर्भात, मग दर अधिक का ? आंदोलकांचा सवाल

यासंदर्भात नैसर्गिक संसाधन तज्ज्ञ प्रदीप माहेश्वरी म्हणाले , बुटीबोरीमधे पेट्रोकेमिकल आणि फर्टिलायझर कॉम्प्लेक्स उभारण्याची घोषणा यापूर्वी झालेली होती. हा प्रकल्प सुरू झाल्यास या भागातील बेरोजगारीचा प्रस्न काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. रिफाइनरी पेट्रोकेमिकल काम्प्लेक्सची घोषणा तत्कालीन पेट्रोलियम मंत्री धर्मेन्द्र प्रधान यांनी २१ जून २०२१ ला केली होती. फेब्रुवारी २०२३ मध्ये या प्रकल्पाच्या आर्थिक योग्यता अहवाल तयार करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २.५ कोटी रुपये मंजूर केले होते.हे काम एमआयडीसीकडे सोपवण्यात आले होते. पुढे त्याचे काहीच झाले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भात गुंतवणूक वाढवण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेऊन रत्नागिरीतील प्रस्तावित रिफाइनरी विदर्भात आणावी.यामुळे ५ लाखांवर रोजगार निर्मिती होऊ शकते. तसेच सरकारलाही यापासून १ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळू शकते, असे नैसर्गिक संसाधन तज्ज्ञ प्रदीप माहेश्वरी म्हणाले.

हेही वाचा >>>वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्र्यांना नागपूरकरांचे पत्र,जरा याकडे लक्ष द्या

राखेवर प्रक्रिया करणारे प्रकल्प

नागपूर जिल्ह्यातील औष्णिक वीज प्रकल्पातून निघणाऱ्या राखेवर प्रक्रिया करून सिमेंट उद्योग सुरू केल्यास प्रदूषणाचे प्रमाण कमी होऊ शकते. एनटीपीसीने हा प्रयोग केला आहे. कोराडी:खापरखेडा प्रकल्पात असा प्रयोग करावा, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे. शहरात मोठ्या प्रमाणात बाहेरून वाहने ,जड वाहने रोज येतात. त्यामुळेही प्रदूषणात वाढ होत आहे. नागपूरला लागून असलेल्या चंद्रपूर, गोंदिया, अमरावती आणि छिंदवाडा जिल्ह्यांना जोडणाऱ्या लोकल रेल्वे गाड्या सुरू केल्या तर या भागातील २२० गावे व शहरांना सार्वजनिक वाहतुकीची सुविधा मिळेल तेथून येणाऱ्या खासगी वाहनांची संख्या कमी झाल्याने आणि प्रदूषण कमी होईल, असे नैसर्गिक संसाधन तज्ज्ञ प्रदीप माहेश्वरी म्हणाले..

मिहान प्रकल्पाला चालना द्या

मिहान प्रकल्पाची घोषणा झाली त्यावेळी विदर्भाचे आर्थिक चित्र बदलणारा हा प्रकल्प असल्याचा दावा तत्कालीन सरकारकडून करण्यात आला होता. मात्र मोजक्याच कंपन्या सोडल्या तर येथे मोठे प्रकल्प सुरू झाले नाही. सध्या येथे दोन एमआरओ सुरू आहेत. टाटा कंपनीचा एमआरओ सुरू करावा,असे विनंती पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा उद्योग समुहाला पाठवले होते. मात्र टाटाला नागपूरमध्ये आणण्यात सरकारला अपयशआले. नागपूरचे आतंराष्ट्रीय विमानतळ आंतरराष्ट्रीय प्रवासी व मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वपूर्ण असल्याने येथे विमान देखभाल दुरुस्ती केंद्र सुरू केले जाऊ शकते. ते सुरू झाल्यास नागपूरमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या तरुणांना रोजगाराची संधी मिळू शकते, यासाठी गडकरी यांनी प्रयत्न करावे,अशी मागणी आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The first budget of the bjp led government will be presented nagpur cwb 76 amy