अमरावती: औषध निर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे संतापाच्या भरात प्राध्यापकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.
प्रा. चैतन्य अरविंद गुल्हाने (३०, रा. महालक्ष्मीनगर) असे जखमी प्राध्यापकाचे नाव आहे. या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलिसांनी अर्पित जयवंत देशमुख (२१, रा. सातेगाव, ता. अंजनगाव सुर्जी) या विद्यार्थ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तो पसार झाला आहे.
हेही वाचा… सर्व सेवा संघ करणार देशभरात आंदोलन; अध्यक्षपदी चंदन पाल यांची निवड
प्रा. चैतन्य गुन्हाने हे महाविद्यालयामधून सायंकाळी घराकडे परत जात असताना संशयित विद्यार्थ्याने त्यांना अडवून चाकूने गुल्हाने यांच्या पोटात वार केले. गुल्हाने यांनी जखमी अवस्थेतच सहकारी प्राध्यापक आणि नातेवाईकांना फोन करून हल्ल्याची माहिती दिली. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. फ्रेझरपुरा पोलिसांनी जखमी प्राध्यापकाचा जबाब नोंदवून घेतला. गुण कमी मिळाल्याने रागाच्या भरात संशयित विद्यार्थ्याने हल्ला केल्याचे सकृतदर्शनी दिसून येते, असे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोर विद्यार्थ्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.