वर्धा : माकडांचा उच्छाद जीव नकोसा करून टाकणारा ठरतो तर कधी चालत्या वाहनावर उडी मारल्याने जीव घेणाराही ठरतो. मात्र, मांडगाव येथील गावकऱ्यांनी हा उच्छाद एकदाचा थांबावा म्हणून चक्क बंदर बंदोबस्त समितीच गठित केली. माकडांना हद्दपार करण्याचा खर्च म्हणून घरोघरी जात वर्गणी गोळा केली. लोकांनी उत्स्फूर्त मदतही केली. कारण प्रत्येक रहिवासी त्रस्त होता.
घरावर, फळबागेत,आंगणातील वाळवण माकडांच्या उड्यांनी ध्वस्त होत होते. आक्रमक माकडांनी तर नागरिकांवर हल्ले सुरू केले होते. त्यांची दहशत वाढू लागल्याने गावकऱ्यांनी बंदोबस्त करण्याचे उपाय सुरू केले. माकड पकडण्यात तरबेज हैदर खान यांना पाचारण करण्यात आले. वन विभागास सूचना देण्यात आली. ठराविक ठिकाणी पिंजरे ठेवल्या गेले. पहिल्या दिवशी बसस्थानक चौकात ३६ माकडे पिंजऱ्यात अडकली. दुसऱ्या दिवशी भरवस्तीत ७२ माकडे पकडण्यात आली. या १०८ माकडांना मग जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. आता गावाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.