अमरावती : जिल्‍ह्यातील रिद्धपूर या महानुभाव पंथाच्‍या प्रमुख केंद्राचे मराठी साहित्‍याच्‍या विकासातील महत्त्वाचे योगदान लक्षात घेऊन या ठिकाणी मराठी विद्यापीठाच्‍या स्‍थापनेची घोषणा यंदाच्‍या अर्थसंकल्‍पात करण्‍यात आली. तज्‍ज्ञांची समिती पंधरा दिवसांत नेमण्‍याची घोषणा तीन वेळा करण्‍यात आली, पण अद्यापही समिती स्‍थापन न करण्‍यात न आल्‍याने विद्यापीठाच्‍या स्‍थापनेत नमनालाच अडथळे निर्माण झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्‍हणून केंद्र सरकारच्‍या पातळीवर पाठपुरावा सुरू असतानाच मराठी विद्यापीठाच्‍या निर्मितीची घोषणा ही अभिजात भाषेच्‍या चळवळीला बळ देणारी मानली गेली. वर्धा येथे हिंदी विद्यापीठ आहे, रामटेक येथे संस्‍कृत विद्यापीठ आहे, पाठोपाठ रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठाच्‍या घोषणेचे स्‍वागत सर्वच स्‍तरावर करण्‍यात आले. विद्यापीठाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी तज्‍ज्ञांची एक समिती १५ दिवसांत स्थापन करण्यात येईल. समितीत एका महानुभाव अभ्यासकाचा समावेश असेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्‍या ११ एप्रिल रोजी अमरावती येथे दिली होती. पण, अजूनही समितीच्‍या स्‍थापनेचा शासन निर्णय न झाल्‍याने साहित्‍य वर्तुळातून नाराजीचा सूर उमटला आहे.

हेही वाचा – नागपूर : विद्युत प्रकल्पांमधील राख ही किरणोत्सर्गी तरीही लोकवस्तीजवळ प्रकल्पाचा अट्टाहास का ?

महानुभाव संप्रदायाचे रिद्धपूर तीर्थस्थान आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी रिद्धपूर येथे मठाची स्थापना केली. महानुभाव पंथाचे नागदेवाचार्य, म्हाइंभट्ट, केशिराज व्यास, महदाईसा यांनी पंथाचा विचार पुढे नेला. त्याचदरम्यान लीळाचरित्र, सिद्धांतसुत्रे, सूत्रपाठ, दृष्टांत, प्रमेय-ग्रंथ अशी महानुभाव पंथाची ग्रंथसंपदा निर्माण झाली. मराठी भाषेतील आद्यग्रंथ याच ठिकाणी लिहिला गेला, असे मानले जाते. रिद्धपूरला मराठी विद्यापीठाची स्थापना व्‍हावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्‍यात येत होती.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखालील भाषा सल्लागार समितीने मराठी भाषा विकासाच्‍या धोरणाचा मसुदा राज्यासमोर ठेवला. २५ वर्षांसाठी मराठी भाषेचे धोरण निश्चित करताना मराठी भाषा विद्यापीठाची आवश्यकता असल्याचे मसुद्यात नमूद करण्‍यात आले होते. मराठी विद्यापीठाची सर्वप्रथम कल्पना १९३३ साली नागपुरात झालेल्या मराठी साहित्य संमेलनात मांडण्यात आली. त्यानंतर विविध साहित्‍य संमेलनातही हे विद्यापीठ स्थापन व्‍हावे, अशी अपेक्षा व्‍यक्‍त करण्‍यात येत होती. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने सातत्‍याने त्‍यासाठी पाठपुरावा केला होता. मराठी विद्यापीठाच्‍या घोषणेचे स्‍वागत करण्‍यात येत असले, तरी प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्‍याने नाराजीदेखील उमटण्‍यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : खासदार धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक; दिल्लीतील वेदांता रुग्णालयात उपचार सुरू

तज्‍ज्ञांची समिती पंधरा दिवसांत नेमण्याची शासनामार्फत तिसऱ्यांदा घोषणा होऊन सुमारे तीन महिने उलटून गेले, तरीही ती नेमलीच गेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना तिसरे स्मरणपत्र पाठवण्‍यात आले आहे. संबंधित शासन निर्णय अद्याप निर्गमित झालेला नाही, याकडे मुख्यमंत्र्यांचेही लक्ष वेधण्यात आले आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is no committee set up for marathi university in riddhapur mma 73 ssb