यवतमाळ : पालकमंत्रिपदासाठी कोणतीही रस्सीखेच नाही. वरिष्ठ नेते जी जबाबदारी देतील, ती पार पाडू. मात्र नुकत्याच गठित झालेल्या मंत्रिमंडळात मला आधीचेच मृद व जलसंधारण खाते देण्यात आले. तोच न्याय यवतमाळ जिल्ह्याचा पालकमंत्री ठरवताना कायम राहिल्यास, माझ्याकडेच पालकमंत्री पदाची जबाबदारी येईल, असा विश्वास राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी मृद व जलसंधारण विभागातील रिक्त पदे भरण्याबाबतही भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ येथे प्रथम आगमनानिमित्त बुधवारी शिवसेनेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महायुतीत सर्व निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या समन्वयातून होतात. पालकमंत्रिपद कोणाला द्यायचे हे नेतेच ठरवतील. यापूर्वी यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून यशस्वी काम केले आहे. या कामाचा अनुभव पाठीशी आहे. शिवाय या दोन्ही जिल्ह्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन दौरे झाले. त्यांनीही माझे कामाबद्दल कौतुक केले आहे, अशी पुष्टी संजय राठोड यांनी जोडली.

हेही वाचा : Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…

राज्यात नवीन वर्षात ‘पाणलोट रथयात्रा’

दरम्यान, माती आणि पाणी या दोन महत्वाच्या घटकांशी निगडीत असलेल्या मृद व जलसंधारण विभागांतर्गत जलसंवर्धनाच्या जनजागृतीसाठी नवीन वर्षात ‘पाणलोट रथयात्रा’ काढण्यात येणार आहे. ही यात्रा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात संपूर्ण राज्यात फिरणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शेती, सिंचन या दृष्टीने मृद व जलसंधारण विभागत अत्यंत महत्वाचा आहे. राज्यात असलेले छोटे तलाव व पूर्व विदर्भातील मामा तलावांतील गाळ उपसा, खोलीकरण करून त्याची सिंचन क्षमता वाढविण्यात येणार आहे. पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत नाला सरळीकरण, खोलीकरण, कालवा, पाटसऱ्या दुरूस्ती करण्यात येणार आहे. नव्याने कालवे निर्मिती पाईप टाकून करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही व शेवटच्या टोकापर्यंत पाणी पाहोचविण्याचा आमच्या विभागाचा प्रयत्न राहिल, असे त्यांनी सांगितले.या कामी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यासह पाणी, नाम फाऊंडेशन, अण्णा हजारे, पोपटराव पवार आदींचे सहकार्य मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार

१०० दिवसांचा विकास कार्यक्रम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांचा विकास कार्यक्रम जाहीर केला आहे. मृद व जलसंधारण विभागही १०० दिवसांत राज्यात अनेक उपक्रम व योजना राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. याची सुरूवात मंगळवारी मंत्रालयात राज्यातील विविध संस्थाची बैठक घेवून त्यांच्याकडून सूचना मागवून करण्यात आली. त्यामुळे मृद व जलसंधारण विभागही लवकरच इतर विभागांप्रमाणे वैशिष्टपूर्ण कामांसाठी ओळखला जाईल, असे ते म्हणाले. राज्यात लवकरच जलयुक्त शिवार टप्पा दोन सुरू करण्यात येणार आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना जवळच्या धरण व तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंवर्धनाच्या जगजागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजनही केले जाणार आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आदर्श गाव, बचत गट, सिंचन विकास, पडीक जमीन विकास अशा अनेक क्षेत्रात काम करून या विभागाला नावलौकीक मिळवून देवू, असे यावेळी मंत्री संजय राठोड म्हणाले.

हेही वाचा : शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई

६६० पदांची भरती प्रक्रिया सुरू

रिक्त पदांमुळे मृद व जलसंधारण विभागास काम करण्यास मर्यादा येत आहे. विभागाच्यावतीने सध्या ६६० पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. आणखी तीन हजार पदे भरण्यात येणार आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three thousand posts will be filled in the soil and water conservation department says minister sanjay rathod nrp 78 css