गोदिया : देवी विसर्जनादरम्यान तलावात खोदलेल्या खड्ड्यात तोल गेल्याने तीन तरुणांचा त्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सावरी टोला (रावणवाडी) येथील संकुलात शनिवारी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास घडली. आशीष फागुलाल दमाहे (२२), अंकेश फागुलाल दमाहे (१९), यश गंगाधर हिरापुरे (१९) तिघे रा. सावरी ता.गोंदिया असे या घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गावातील तलावात रस्त्याच्या कामासाठी मे २०२४ मध्ये खोदण्यात आलेल्या खड्ड्यात देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना तीन तरुणांचा तोल जाऊन खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना सावरी येथे घडली. १२ ऑक्टोबर रोजी रात्री १०:३० वाजता रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळतात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने रात्री 3 तास तलावात मृतदेह शोधून एक मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले आणि दुसरा मृतदेह रविवारी सकाळी सापडला आणि एक उपचारासाठी घेवून जात असताना तिसऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी सावरी गावातील इतर रहिवासी दुर्गा देवी मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन कार्यक्रमात सहभागी झाले होते. अंतिम टप्प्यात सावरी टोला येथील तलावात मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गावातील ९ तरुण देवीची मूर्ती घेऊन तलावाकडे गेले असता, यश हिरापुरे, आशिष दमाहे, अंकेश दमाहे आणि मागून मूर्ती धरून बसलेला आणखी एक युवक पुढे आला. तलावात खोदलेल्या खड्ड्यात तीन तरुणांची जलसमाधी झाली आणि दुसऱ्या तरुणाने कशी तरी वरून मूर्ती हलवून त्यांचे प्राण वाचवले. या घटनेत मृत्यू झालेल्या आशिष दमाहे या तरुणांची नुकतीच लष्करात निवड झाली होती आणि काही प्रशासकीय प्रक्रियेनंतर तो सरकारी सेवेत रुजू होणार होता.

हे ही वाचा…धम्मचक्र प्रवर्तन दिन : दीक्षाभूमीत राजकीय नेत्यांची अनुपस्थिती तरीही मंचावर झाला मोठा वाद…

तलावाच्या खोल खड्ड्यात बुडून या तिन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच रावणवाडी पोलीस व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चे पथक घटनास्थळी दाखल झाले. या हृदय द्रावक घटनेमुळे रावणवाडी, सावरी, सावरीटोला परिसरात शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रावणवाडी पोलिस ठाणे चे पोलिस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हे ही वाचा…जयंत पाटील यांना घेरण्याचे विरोधकांबरोबरच मित्रपक्षांचेही प्रयत्न

प्रत्यक्षदर्शी काय म्हणतात ?

सावरीटोला शाळेसमोरील तलावात देवी मूर्तीचे विसर्जन सुरू असताना तलावात पडलेल्या खोल खड्डय़ाची माहिती नसलेले तरुण “जय माता दी” चा गजर करत मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी घेऊन जात असताना, यादरम्यान सर्व तीन तरुण खड्ड्यात उतरले आणि त्यांचा तोल बिघडल्याने मूर्ती आणि तीन मुले खड्ड्यात बुडाली. या तलावातील अवैध उत्खनन व रात्री दरम्यान हे खड्डे नीट पणे न बुजवल्याने ही घटना घडल्याचे सावरी टोला येथील या घटनेला प्रत्यक्ष पाहणारे नागरिक सांगत आहेत.