यवतमाळ : पुसद तालुक्यातील आमदारी घाटात एक अनियंत्रित ट्रक थेट एका घरात घुसला. या ट्रकच्या धडकेने घरालगत असलेल्या शाळेच्या शौचालयाचे छत कोसळले. या छताखाली सात वर्षीय विद्यार्थिनीचा दबून मृत्यू झाला. शीतल पांडूरंग किरवळे (७), रा. आमदरी असे मृत मुलीचे नाव आहे. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास अपघात घडल्यानंतर पोलिसांनी कोणतीही जीवितहानी झाली नाही, असा निर्वाळा दिल्यानंतर सायंकाळी बेपत्ता शाळकरी मुलीचा मृतदेहच मलब्याखाली आढळल्याने खळबळ उडाली.

पुसद येथून नांदेडकडे सिमेंट घेवून जात असलेला ट्रक (क्र. एमएच १०, सीआर ७७११) चालकाचे नियंत्रण सुटल्याने आमदरी घाटात ट्रक रस्याातलगत असलेल्या आमदरी येथील रस्याचेलगत एका घरात घुसला. या घरालगत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे शौचालय आहे. या धडकेत शौचालयाचे छत कोसळले. शाळेत आलेली शीतल त्याचवेळी शौचालयात गेली असवी आणि नेमका अपघात घडून छताखाली दबली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र या अपघातानंतर येथे आलेल्या पोलिसांनी कोणतीही जीवितहानी नाही, असा निर्वाळा दिला होता.

हेही वाचा…यवतमाळात मुसळधार पाऊस, बेंबळा धरणाचे चार दरवाजे उघडले

परंतु, शीतलचे आई-वडील सायंकाळी शेतातून घरी आल्यानंतर मुलगी शाळेतून का आली नाही, म्हणून शोध घेतला असता, ट्रकच्या धडकेत कोसळलेल्या छताखाली रात्री उशिरा शीतलचा मृतदेहच आढळला. या घटनेने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी अपघातानंतर पंचनामा केला तेव्हा ही बाब उघडकीस का आली नाही म्हणून गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला. पोलीस व शाळेतील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शीतलचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी सोमवारी रात्री उशिरा पुसद-हिंगोली मार्गावर चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक बंद होती. या घटनेने आमदरी येथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला. या अपघातप्रकरणी सिमेंट वाहतूक करणाऱ्या अपघातग्रस्त ट्रक चालकास पुसद पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा…‘जय हरी विठ्ठल’चा गजर अन् विशेष गाडी रवाना; भुसावळ रेल्वे विभागातून प्रथमच…..

गर्भवती महिला जखमी

आमदरी घाटात हा अपघात झाला त्यावेळी एक गर्भवती महिला रस्याेलच्या कडेने जात होती. ट्रक अंगावर येईल या भीतीने ती पळाल्याने पडली व त्यात तिला दुखापत झाल्याने तीसुद्धा जखमी झाली. तिच्यावर यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. आमदरी घाटात सातत्याने अपघात होत आहेत. मात्र बांधकाम विभागाकडून येथे कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.